Google, Amazon, Twitter, Meta अशा मोठ्या ब्रांड्समध्ये काम करणारे कर्मचारी सध्या काहीसे तणावात आहेत. त्याचं कारण आहे कपातीची टांगती तलवार. एलॉन मस्क यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली. ट्विटर ही कंपनी कपातीची घोषणा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी होती. अशाच अमेरिका स्थित कंपन्यांमध्ये सध्या कर्मचारी कपात करण्यात येते आहे. यामुळे जगभरातले कर्मचारी चिंतेत आहेत. कदाचित उद्या मला जायला सांगतील का? असं जवळपास प्रत्येकाला वाटतं आहे. एलॉन मस्क यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता नोव्हेंबर २०२२ च्या सुरूवातीलाच अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला. हजारो कर्मचाऱ्यांनी त्यांचा इमेल आयडी, बॅज आणि स्लॅक अॅक्सेस गमावला. त्यांना एक मेल आला की तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलं आहे. ट्विटर इंडियाच्या अशाच नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक होता २५ वर्षांचा यश अग्रवाल. पब्लिक पॉलीसी असोसिएट या पदावर तो ट्विटरमध्ये काम करत होता. पण नोव्हेंबरमध्ये त्यालाही मेल आला आणि त्याची नोकरी गेली. मी मला कामावरून काढल्याचा तो इमेल वाचला आणि झोपी गेलो. मला हा इमेल यायच्या आधीच ऑफिसमध्ये चर्चा सुरू झाली होती की लोकांना काढण्यात येणार आहे. कधी ते सांगितलं नव्हतं पण कर्मचारी कपात होणार याची चर्चा सुरू झाली होती. किती लोकांची नोकरी जाणार आणि कोणाला घरी जावं लागणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत यश अग्रवालने हे म्हटलं आहे. भारतातच नाही तर आपल्या देशाबाहेर काम करणाऱ्या तरूणांमध्येही अशीच अनिश्चितता होती असंही यशने सांगितलं. माझ्या मनात नंतर कुठलेच विचार आले नाहीत. मला हे वाटलं की मी ट्विटरचा भाग झालो त्यामुळे मी त्या कंपनीविषयी कृतज्ञ आहे. कारण इथला काम करण्याचा अनुभव खरोखरच चांगला होता. मी जेव्हा नोकरी करू लागलो तेव्हा ह्युमन सेंट्रिक कल्चर म्हणजे लोकांना सामावून घेणारी संस्कृती कंपनीत होती. कुठलीही मायक्रो मॅनेजमेंट नव्हती. काम पूर्ण होतं आहे तोपर्यंत व्यवस्थापनही व्यवस्थित होतं. आम्ही टीम म्हणून एकमेकांच्या पाठिशी उभे होतो. त्यावेळी ऑफिसमध्ये कधी जायचं अमुक एक शिफ्टलाच जायचं का? अशी काही बंधनं नव्हती. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मात्र अनेक गोष्टी बदलल्या. आता ऑफिसला येणं ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक झालं आहे. तसंच शिफ्ट तर पूर्ण कराच शिवाय वेळ पडल्यास जास्त वेळ थांबावंही लागेल असा मेलही मस्क यांनी पाठवला. जे आधी लोक हसतखेळत करत होते त्याची सक्ती सुरू झाली. यश पुढे म्हणाला की जेव्हा मी ट्विटरमध्ये काम करत होतो तेव्हा समजा हातून चूक झाली तर ती चूक परत करू नका असं सांगितलं जायचं. अशीच कार्य पद्धती जगभरात होती. मात्र एलॉन मस्क आले आणि त्यांनी एक चूक झाली की लोकांना घरचा रस्ता दाखवला अशी अनेक उदाहरणं ते आल्यानंतर झाली. चूक होणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. मात्र त्यासाठी नोकरीच जाणार असेल तर कसं चालेल असंही यश म्हणाला. यशची नोकरी गेली, त्याला कंपनीने ले ऑफचं कारण देऊन काढलं तरीही तो हे सांगतो की ट्विटरमध्ये काम करत होतो ती माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम वर्षे होती. मी माझ्या काही माजी सहकाऱ्यांच्या संपर्कात आहे. माझ्यासोबत ज्यांची नोकरी गेली होती त्यांच्यापैकी काही जणांना आणखी चांगली नोकरी मिळाली. यश अग्रवाल म्हणतो की इतक्या मोठ्या ब्रांडमधून जर लोकांची नोकरी जाणार असेल तर त्यासाठी कंपनीचं आर्थिक धोरण जबाबदार आहे. त्याचा पुनर्विचार केला गेला पाहिजे. एवढंच नाही तर ज्या लोकांना कंपनीने काढलं आहे त्यांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे आणि ती लवकर मिळेल हे पाहिलं पाहिजे असंही यश म्हणतो. ट्विटरने अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे दिलेले नाहीत ते लवकर दिले पाहिजेत अशी अपेक्षाही त्याने बोलून दाखवली. ज्यांना नोव्हेंबरमध्ये काढून टाकण्यात आलं आहे त्या कर्मचाऱ्यांना किमान जानेवारीच्या शेवटापर्यंत पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.