मंडईमध्ये विकली जाणारी भाजी ही थेट शेतातून आणली असल्याचे कित्येक विक्रेते सांगतात. आपणही नेहमीच तिथून भाजी घेत असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवतो. मात्र, मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक भाजी विक्रेता चक्क गटारीच्या पाण्यात भाजी धुवत असताना दिसून आला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत भोपाळमध्ये ही दुसरी अशी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या भाजी विक्रेत्यांवर कधी चाप बसणार असा प्रश्न लोक विचारत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रोहित नगरचा असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित नगर, गुल मोहर मार्केट, बिटन मार्केटमध्ये या भाज्यांची विक्री होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी भाजी खरेदी करतांना विक्रेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. गटारीच्या घाण पाण्यात धुतलेल्या भाज्या शरीरासाठी घातक आहेत. त्यातच करोना काळात लोक आरोग्याबाबत अधिक काळजी घेत असताना भाजी विक्रेते घाणेरड्या पाण्यात भाज्या धुवून त्याची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा संताप लोकांनी व्यक्त केलाय. अशा भाज्या खाल्ल्याने अनेक आजार होण्याची भीती असते. खूप दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्यात अनेक प्रकारचे जीवाणू असतात, अशा परिस्थितीत भाज्या धुणे आणि त्याचा थेट वापर केल्यास पोट आणि यकृताशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात.