राजस्थान मधील उदयपूर येथे २८ जूनला शिवणकाम करणाऱ्या कन्हैया लाल यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर देशभरात राजकीय वादळाला सुरुवात झाली. या पूर्ण शहराचा सांप्रदायिक संतुलन ढळलं होतं. काही काळासाठी या शहरात कर्फ्यू देखील लागू करण्यात आला होता, मात्र आता याच उदयपूर मध्ये मंगळवारी ९ ऑगस्टला मोहरमचा उत्सव साजरा केला गेला. यावेळी एका हिंदू धर्मीय कुटुंबाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ होताना वाचला. या घटनेने देशभरातील जनतेचे मन जिंकलं आहे.

उदयपूर मधील मोचीवाडा या भागातील पलटन मस्जिदचा शेवटचा ताजिया निघाला होता. यावेळी अचानक ताजिया मध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या, कदाचित दिव्याच्या वातीमुळे किंवा अगरबत्तीमुळे कापडाने पेट घेतला असावा असा अंदाज आहे. अशावेळी तिथे उपस्थित काही हिंदू कुटुंबांनी आपापल्या घराच्या खिडकीतून, घराच्या गच्चीवरून पाणी ओतायला सुरुवात केली आणि अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात त्यांना यश आले. या घटनेनंतर ताजिया मधील सर्व उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून आग विझवणाऱ्या सर्वांचे कौतुक केले व आभार मानले.

दरम्यान या प्रसंगानंतर शहरातील हिंदू- मुस्लिम धर्मीयांमधील दुरावा काही अंशाने कमी होण्यास मदत झाली असे मत तहसीलदार ताराचंद मीना यांनी व्यक्त केले. योगायोग असा की हे घटनास्थळ कन्हैया लाल यांचे शिलाईचे दुकान असलेल्या मालदास या रस्त्याच्या अगदी जवळच आहे.

कडक माल था! पोलिसांची इंस्टाग्राम पोस्ट पाहून नेटकरी हैराण; खरं कारण होतं…

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचं समर्थन करण्याच्या वादावरून शिवणकाम करणाऱ्या कन्हैया लाल यांची रियाझ अत्तारी आणि घौस मोहम्मद या हल्लेखोरांनी हत्या केली होती. उदयपूरमध्ये दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने कन्हैया यांच्यावर वार केले आणि या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता.