India Pakistan War Tension video: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर निर्णय घेत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत ‘एअर स्ट्राईक’ करत पाकिस्तानमधील ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, अद्यापही पाकिस्तानची आगळीक सुरु असून पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढल्याची परिस्थिती समोर येत आहे. तसेच पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताचं सैन्यही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. शुक्रवारी (९ मे) रात्री पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक चक्क क्षेपणास्त्राच्या तुकड्यासोबत फोटोशूट करताना दिसत आहेत. हे मिसाईल त्यांना शेतात पडलेलं सापडलं. आणि मग त्यांनी जणू ते एखाद्या ट्रॉफीसारखं हातात घेतलं आणि फोटो काढायला सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल एवढं नक्की.

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ पंजाबमधील असल्याचं समजतं. या ठिकाणी लोकांना गव्हाच्या शेतामध्ये मिसाईलचा एक तुकडा सापडला. मिसाईल फुटल्यानंतर त्याचे काही अवशेष खाली पडतात यावेळी तोच तुकडा स्थानिक लोकांच्या हाती लागला. परिस्थीती एवढी गंभीर असताना हे लोक या मिसाईलच्या तुकड्याबरोबर मोठ्या बिनधास्त फोटो काढताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सर्व स्तारातून यावर टीका केली जात आहे.

जम्मूमध्येही पहाटे ड्रोन हल्ले

जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळाला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानी सैन्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच तेथील स्थानिक रहिवाशांच्या मते पहाटेपर्यंत शहरात अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. दरम्यान, राजौरी शहरावर जोरदार तोफांचा मारा करण्यात आला. ज्यामध्ये मुख्य शहराला लक्ष्य करण्यात आलं होतं. पहाटेच्या सुमारास पठाणकोट शहरात देखील अनेक स्फोटांचे आवाज आले. कमीत कमी अर्धा तास अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. तसेच भारतीय सैन्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे काहीतरी गांभीर्य ठेवा” तर आणखी एकानं, “देशात सध्या परिस्थिती काय आहे सरकारला सहकार्य करण्याएवजी हे काय करताय तुम्ही..” अशी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.