कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आल्यानंतर आज त्यांची चौकशी सुरु झाली आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात राज ठाकरे पोहोचले असून बंद दरवाज्याआड त्यांची चौकशी सुरू आहे. राज यांची २२ ऑगस्ट रोजी चौकशी सुरु होणार असे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने ठाणे बंदची हाक देत गरज असेल तरच बाहेर पडा असा इशारा दिला होता. मात्र नंतर हे आंदोलन मागे घेत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले. मुंबई, ठाण्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगसाईटवरही अनेकांनी राज यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधातही पोस्ट करुन आपली मते मांडली आहेत.

राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मनसे सैनिकांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतला नाही. मुंबई तसेच ठाण्यातील अनेक भागांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त असला तरी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मुंबई तसेच ठाण्यात सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु आहेत. याची नेटकऱ्यांनाही दखल घेतली असून अनेकांनी याबद्दल मनसेचे कौतूक केले आहे.

तर दुसरीकडे काही जणांनी राज ठाकरेंवर मिम्सच्या माध्यमातून तसेच कठोर शब्दांमध्ये टिका केल्याचेही पहायला मिळत आहे.

१)

२)

३)

४)

दरम्यान, आज राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.