Road Accident Video: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात घडलेली एक हृदय थरथरवणारी दुर्घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. राष्ट्रीय महामार्गावर घडलेला हा भीषण जीवघेणा प्रसंग इतका अचानक घडला होता की, पाहणाऱ्यांचेही पाय थरथर कापतील. दुकानासमोर रस्त्यावरील धूळ खाली बसावी म्हणून एक तरुण शांतपणे पाणी ओतत उभा… आणि काही क्षणांतच येणाऱ्या मृत्यूच्या सावलीनं त्याला गाठलं.

ही दुर्घटना गोरखपूर-सोनौली राष्ट्रीय महामार्गावर घडली. रस्त्यावरील धूळ खाली बसावी म्हणून अबोधपणे पाणी ओतणाऱ्या त्या तरुणाला मागून वेगाने धावणारी कार क्षणात त्याला जोरदार धडक देते. त्या धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, तो तरुण तब्बल ३० फूट दूर हवेत उडून जाऊन रस्त्यावर आदळला. हा सर्व प्रसंग जवळच्या दुकानावरील सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो विजेच्या वेगाने सामाजिक माध्यमांवर पसरत आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की… तरुण पाणी ओतत उभा आहे. त्याच्या मागे दुसरी एक व्यक्ती फावड्याने खेळकरपणे क्रिकेट शॉटची नक्कल करीत उभा. वातावरण निवांत… कुठलाही धोका नसल्यासारखं आणि अचानक दूरवरून वेगाने येणारी कार नियंत्रण सुटल्यासारखी हेलकावते, रेषेबाहेर जाते आणि सरळ त्या तरुणावर आदळते. कार धडक देताच धुळीचा खूप उंच लोळ उडतो आणि त्या तरुणाचं शरीर हवेत झेपावत दूर फेकलं जातं. ते दृश्य पाहून मागे उभा असलेला माणूस क्षणभर थिजून जातो… पुढे काय करावं हेही त्याला सुचत नाही.

या दुर्घटनेत जीव गमावलेला तरुण म्हणजे अभिषेक यादव. धक्कादायक बाब ही की, अभिषेकचा विवाह केवळ दोन वर्षांपूर्वीच झाला होता. रोजच्या कामासाठी घराबाहेर पडलेला तो परत कधीच येणार नाही, हे कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल.

दुर्घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला; परंतु पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. नौतनवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेऊन, उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

या संपूर्ण दुर्घटनेनं स्थानिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. “एका क्षणात सर्व काही संपलं…” अशी प्रतिक्रिया जवळच्या साक्षीदारांनी दिली. महामार्गावरून वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे उदभवणारा धोका किती भयानक ठरू शकतो, याचं हे भीषण उदाहरण आहे.

अभिषेकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे, सीसीटीव्हीत कैद झालेला क्षणभराचा तो प्रसंग लाखो लोकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. रस्त्यावर सावध न राहिल्यास तुमचा जीव पुढल्या क्षणी सुरक्षित असेल का याची खात्री कोणी देऊ शकत नाही हेच या प्रसंगातून दिसून येते.

येथे पाहा व्हिडीओ

ही दुर्घटना आपणाला सावध राहण्याचा, वेगावर नियंत्रण ठेवण्याचा आणि रस्त्यावर दुसऱ्याच्या जीवाचंही मोल आहे हे अधोरेखित करणारा संदेश देऊन जाते.