कुटुंबियांच्या अन्नात विष मिसळून अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. या अन्नाचे सेवन केल्यानंतर कुटुंबातील सात जण बेशुद्ध पडले. मोरादाबाद जिल्ह्यातील एक गावामध्ये मंगळवारी ही घटना घडली. विष घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर या मुलीची आई, तिच्या दोन बहिणी, दोन भाऊ, वहिनी आणि भाचा बेशुद्ध पडले.

त्यानंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली. या मुलीच्या प्रियकरावर तिच्यावरच बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी जामिनावर बाहेर होता. दोघांच्या प्रेमसंबंधांना मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन एफआयआर नोंदवण्यात आला आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंह यांनी दिली.मुलींच्या कुटुंबियांपैकी दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका महिला आणि तिचे लहान मूल अजूनही रुग्णालयात आहे.

मुलगी अल्पवयीन आहे पण आरोपी अरविंद कुमार विरोधात कलम १२० बी (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३२७ आणि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुलीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी छापे सुद्धा मारले आहेत. मुलीच्या वडिलांनी डिसेंबर २०१८ मध्ये आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद कुमारने मुलीच्या भावाला धमकावले होते. प्रेमसंबंधांना विरोध केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने दिली होती.