राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटते का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या फेसबुक लाइव्हदरम्यान शिंदेंच्या फेसबुक पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं होतं. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारवर टीका केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदेंवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नसल्याची टीका करत महाविकास आघाडीतून बाहेर पडणाऱ्या शिंदे गटानेच आता संवाद होऊ नये अशी तरदूत करत कमेंट सेक्शन बंद केल्याचा टोलाही राष्ट्रवादीने लगावला आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरील फोटो आणि व्हिडीओवर आता युझर्सला त्यांना फॉलो करणाऱ्यांना कमेंट करता येत नाही. मुख्यमंत्री शिंदेंच्या पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलेलं आहे. सर्वात आधी ही बाब सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री दिल्लीमधून पत्रकार परिषद घेत असताना समोर आली. सायंकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेच्या फेसबुक लाइव्हदरम्यान शिंदेंच्या पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आल्याचं दिसून आलं.

नक्की वाचा >> अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते? मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, “तो मागे…”

त्यानंतर शिंदेंच्या पेजवरुन पोस्ट होणाऱ्या कोणत्याही पोस्टवर लोकांना कमेंट करता येत नसल्याचं दिसून आलं. यामध्ये अगदी जयंती किंवा विशेष दिनासंदर्भातील पोस्ट असतील, लाइव्ह व्हिडीओ असतील किंवा इतर कोणत्याही पोस्टवर फॉलोअर्सला केवळ रिअॅक्ट आणि शेअर हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. काल हिंगोलीमध्ये झालेल्या सभेच्या लाइव्ह वेबकास्टदरम्यानही कमेंट सेक्शन बंद होतं. एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन कमेंट सेक्शन बंद करण्यात आल्याचा मेसेज पोस्टखाली दाखवला जात आहे.

नक्की वाचा >> “बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी…”; शिंदे सरकार ‘बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार’ असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचं विधान

याच मुद्द्यावरुन शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली आहे. लोकांकडून केली जाणारी टीका आणि प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंना सहन झाले नसावेत त्यामुळेच हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आलाचा टोला राष्ट्रवादी लगावला आहे.

नक्की पाहा >> Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि…; भाजपाला वाटत आहे भीती

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीवारी करत असल्यामुळे अनेक लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का?” असंही राष्ट्रवादीने फेसबुक पोस्टमधून विचारलं आहे. “मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांची इतकी भीती का वाटावी? असा प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सना पडला आहे,” असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पेजवरील कमेंट सेक्शन नेमकं कोणत्या कारणाने बंद करण्यात आलंय याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.