Big Storm Wedding Viral Video : लग्नात गडबड गोंधळ, धावपळ तर होतच असते. पण, काहीवेळा लग्नात अशा काही अनपेक्षित घटना घडतात ज्याचा कोणी विचारही केला नसतो. अनेकदा या घटना रोखायच्या कशा असा प्रश्न वधू-वर कुटुंबीयांनाच नाही तर उपस्थित वऱ्हाड्यांनादेखील पडतो. सध्या सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल; ज्यात लग्नसमारंभानंतर भोजनाचा कार्यक्रम सुरू असतो, याचवेळी अचानक मोठं वादळ येतं. पण, वादळ आल्यानंतरही जेवण न सोडता वऱ्हाड मंडळी नेमकं काय करतात तुम्हीच पाहा.
वादळी पावसामुळे लग्नसमारंभात उपस्थित पाहुण्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. वऱ्हाडी यावेळी जेवणासाठी बसले होते, पण वरून मंडपाचं छप्पर खुलं असल्याने पावसाचं पाणी थेट त्यांच्या जेवणात पडत होतं. यावर उपाय म्हणून वऱ्हाड्यांनी असा काही जुगाड शोधून काढला की, पाहून तुम्हाहीही पोट धरून हसाल. वऱ्हाडी आयुष्यात हे लग्न कधीच विसरू शकणार नाहीत.
नेमकं काय घडलं?
ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली याबाबतची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, हे लग्न सध्या देशात चर्चेचा विषय ठरतेय. तर त्याचं झालं असं की, लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर वऱ्हाड मंडळी जेवणाची व्यवस्था केलेल्या मंडपात जेवणासाठी आरामात बसले होते. याचवेळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. मंडपाला छप्पर नसल्याने पावसाचं पाणी थेट वऱ्हाड्यांच्या ताटात पडू लागलं. पण, वादळ येवो किंवा ढग फाटो; पण काही झालं तरी जेवण सोडायचं नाही असं वऱ्हाड्यांनी ठरवलं होतं वाटतं. त्यामुळे मुसळधार पावसातही वऱ्हाडी चक्क जेवणाच्या टेबलाखाली बसून आरामात जेवू लागले, यावेळी वाढपीदेखील त्यांना काय हवं नको ते पाहण्यासाठी भाजी, पुरी, भात, डाळीच्या मोठ्या प्लेट घेऊन फिरत होते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता, भरपावसात वऱ्हाडी जेवणाच्या टेबलाखाली बसून आरामात जेवतायत.
लग्नसमारंभातील या मजेशीर घटनेचा व्हिडीओ chand_rawat_ajmer नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. एकाने लिहिले की, हे अतिशय सुंदर आहे, जेवण वाया घालवता कामा नये. दुसऱ्याने लिहिले की, काहीपण झालं तरी जेवण महत्त्वाचं. तिसऱ्याने लिहिले की, वादळ, वारा, काहीपण झालं तरी हे लोक जेवूनचं जाणार.