Viral Video: जयपूरमधील प्रसिद्ध जल महलजवळील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे भारतातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत आणि लोकांच्या वागणुकीबाबत पुन्हा चिंता वाढली आहे.
हा व्हिडिओ X वर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामध्ये एक परदेशी महिला पर्यटक दिसते, जिच्या आजूबाजूला अनेक पुरुषांनी गर्दी केली आहे आणि ते तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये अनेक जण तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्शदेखील करताना दिसतात.
व्हायरल व्हिडीओ (Jaipur Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक परदेशी महिला नम्रपणे फोटोसाठी उभी राहताना दिसते. मात्र, तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि शरीराच्या हालचालींवरून ती स्पष्टपणे अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे, कारण तिच्याभोवती खूप गर्दी जमली आहे.
काही लोक खूपच जवळ येऊन सतत तिचे व्हिडिओ शूट करताना दिसतायत आणि काहीजण फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्या खांद्यावर हात ठेवताना देखील दिसतायत. काही लोकांना ही फक्त साधी उत्सुकता वाटली असेल, पण हे वागणं अतिशय चुकीचं आहे. या घटनेमुळे मर्यादा, परवानगी (संमती) आणि विशेषतः महिलांसोबत गर्दीच्या पर्यटन स्थळांवर कसं वागलं जातं याबाबतची चर्चा अधिक वाढली आहे.
सोशल मीडियावर संताप; देशभर चर्चा सुरू
हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर झाल्यानंतर लोकांनी जोरदार टीका केली. भारतात नेहमी सांगितलं जातं “अतिथी देवो भव” हे तत्त्व खरंच प्रत्यक्षात दिसतं का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
या पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे की, अशा घटनांमुळे भारतात आदर आणि उत्सुकतेने येणाऱ्या पर्यटकांना असुरक्षित वाटू शकतं. तर अनेकांनी या व्हिडिओतील वागणुकीबद्दल लाज आणि राग व्यक्त केला.
अनेक वापरकर्त्यांनी असंही म्हटलं की पर्यटन वाढवण्यासाठी फक्त घोषणा करून चालत नाही, तर त्यासाठी नियमांची अंमलबजावणी, सुरक्षिततेची काळजी आणि लोकांमध्ये जागरूकता आवश्यक आहे.
भारताच्या जागतिक पर्यटन प्रतिमेबाबत चिंता
या व्हायरल व्हिडिओमुळे अशा घटनांचा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर कसा परिणाम होतो, याबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटन तज्ञांनी अनेक वेळा सांगितलं आहे की, सुरक्षिततेची भावना प्रवासाचे निर्णय घेण्यात खूप महत्त्वाची असते, विशेषतः एकट्या महिला पर्यटकांसाठी.
कोरोनापूर्वी दरवर्षी भारतात लाखो परदेशी पर्यटक येत होते, आणि सरकारने पर्यटनावरील विश्वास पुन्हा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र, वारंवार व्हायरल होणाऱ्या अशा घटना- जसे की गर्दीचं चुकीचं वर्तन, परदेशी पर्यटकांकडे अनावश्यक लक्ष आणि योग्य नियंत्रणाचा अभाव – या प्रयत्नांना कमी करू शकतात.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक उपायांची मागणी
या घटनेनंतर प्रमुख पर्यटन स्थळांवर अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था असावी, अशी मागणी पुन्हा वाढली आहे. राजस्थानमध्ये पर्यटकांना मदत करण्यासाठी ‘टुरिस्ट पोलीस’ आहेत, पण सोशल मीडियावर अनेकांनी सांगितलं की जलमहलसारख्या गर्दीच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती कमी दिसते.
कायदा आणि सुरक्षा यापलीकडेही या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचं मत आहे की हा प्रश्न फक्त एका व्हिडिओपुरता मर्यादित नाही, तर लोकांचं वर्तन, सामाजिक जबाबदारी, इतरांच्या मर्यादांचा आदर, आणि परवानगी (संमती) याबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज आहे.
