धूर आणि धुक्यामुळे देशाची राजधानी दिल्ली सध्या 'प्रदूषणाची राजधानी' झाली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून धुरक्यामुळे दिल्लीतली परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. धुरक्यामुळे समोरच काही दिसेनासं झालं आहे. लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. शाळा महाविद्यालयात सुटी जाहीर करण्यात आली आहे. अशी चिंताजनक परिस्थिती सध्या दिल्लीत आहे. यावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असताना वीरेंद्र सेहवागनंही या चर्चेत उडी घेतली. नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्विट करत वीरूने या प्रकरणाकडे तमाम भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधले. 'दिल्लीमध्ये इतना कोहरा है की... ' असं ट्विट करत लोकांना या चिंताजनक स्थितीवर काय वाटतं, याबद्दल लिहिण्याचं आवाहन त्याने केले. सेहवागच्या या 'गाळलेल्या जागा भरा' आवाहनाला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर लोक व्यक्त होताना दिसून येत आहेत. Dilli me itna kohra h ki sanson tk pe pehra h — MANISH JOSHI(MJ) (@manishjoshi96) November 9, 2017 Dilli me Itna Kohra hai ki shirt ke neeche pant pehna hai ki nahi, ye bhi nahi dikh raha. — Shashwat Shukla (@ss_registered) November 9, 2017 दरम्यान राजधानीमधल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारसह केंद्र सरकारला फैलावर घेत प्रदूषण कमी करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली, असा प्रश्न विचारला. प्रदूषणाबद्दल केंद्र सरकार आणि शेजारील राज्यांची भूमिका ‘निंदनीय’ असल्याचेही सांगत हरित लवादाने सरकारला फटकारले. या प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने ऑड-इव्हन पॅटर्न पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ऑड-इव्हन पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे, प्रदूषणापासून वाचण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.