Wedding During Blackout Viral Video : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत दहशतवादाविरुद्ध कारवाई करीत आहे. त्या कारवाईंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतर भ्याड पाकिस्तानकडून रात्रीच्या अंधारात भारतावर सातत्याने ड्रोन हल्ले केले जात आहेत.
या हल्ल्यानंतर सीमावर्ती राज्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकआउट करण्यात आला. यावेळी राजस्थानमधील जोधपूर शहरातला संपूर्ण वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. जोधपूरमधील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करीत दिवे बंद ठेवले. आता यासंबंधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्यात जोधपूरमध्ये ब्लॅकआउटदरम्यान एका लग्नसोहळ्यात स्वत: नवरदेवाने पुढाकार घेत सर्व दिवे बंद ठेवले. त्यानंतर अंधारातच हा विवाह सोहळा पार पडला. नवदाम्पत्याने पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत अंधारातच सात फेरे पूर्ण केले. हे अनोखे लग्न ब्लॅकआउटच्या अंधारात साधेपणाने पार पडले. यावेळी त्यांनी प्रथम देशाप्रति असलेले आपले कर्तव्य पार पाडले आणि नंतर आपल्या लग्नविधींना महत्त्व दिले.
या अनोख्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.