रात्र झाली आणि रामदासने रिक्षा घराच्या वाटेवर वळवली. बोरिवलीहून घाटकोपरला जाण्यासाठी रिक्षातला गॅस पुरेसा नाही, हे लक्षात आल्यावर रामदास हादरून गेला. त्याने खिसे चाचपले. दहा रुपयाच्या चार-पाच नोटा खिशात सापडल्यावर त्याला थोडे हायसे वाटले. आजचा दिवस खूपच खराब गेला होता. काय दुर्बुद्धी झाली आणि आपण रिक्षा आरटीओला लावली, या विचाराने रामदास स्वत:शीच चरफडला. खिशात ‘निजी धना’चा पत्ताच नव्हता, ते कमावण्यासाठी बाहेर पडलो, पण निजी धन कमावणे दूरच, त्या ‘डिजीधना’च्या भानगडीत दिवसभर उपास घडला.. आज दिवसभर आपण काहीच खाल्लेले नाही, याची जाणीव होऊन रामदास अस्वस्थ झाला. रिकाम्या पोटी घरी परतायची आजवर कधीच वेळ आली नव्हती. . खिशातले उरलेसुरले पैसे गॅसवर गेले, तर घरचा गॅस पेटणार नाही, या काळजीने रामदासने रिक्षाचा वेग मंद केला. रस्त्याकडेला थांबून पोटभर पाणी पिऊन रामदासने हॅण्डल ओढले. डिजीधनाचा प्रयोग दाखविण्यासाठी आरटीओने पकडून नेलेल्या सगळ्याच रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हरांच्या घरात उद्याचा दिवस खडखडाटच असणार या काळजीने त्याचे मन आणखीनच व्याकूळ झाले. त्याच्या नजरेसमोरून सगळा दिवस सरकू लागला. बोरिवलीच्या आरटीओ कार्यालयात झालेली दमदाटी, विद्यापीठाच्या आवारातील रांगेतले ताटकळणे, ‘डिजीधना’चा तो इंग्रजीतला तास, काहीच न कळलेले प्रश्न आणि मोबाइलवर ‘भीम’ आलाच नसल्याने झालेली उपासमार.. सारे रामदासच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहिले. आसपासच्या स्टॉलवरील चमचमीत खाद्यपदार्थाकडे पाहताना पोटात पेटलेला भुकेचा भडका त्याला आठवला.. मोबाइलवर ‘भीम’ आला असता तर काही तरी पोटात ढकलता आले असते. पण पंतप्रधानांचा तो ‘भीम’ मोबाइलमध्ये आलाच नाही. ‘भीम नसेल तर काहीच मिळणार नाही’ असे सांगून स्टॉलवाल्यांनी वाटेला लावल्याने रित्या पोटी परतून रिक्षा मिळविण्यासाठी आरटीओ साहेबासमोर गयावया करून घरी परतताना, कमाईचा विचारही मनात आला नाही. गोपीनाथच्या मोबाइलमध्ये भीम आला, पण आयत्या वेळी नेटवर्कनेच दगा दिला. त्यामुळे उपासमारीने हिरमुसलेल्या गोपीनाथचा चेहरा आठवून रामदास अस्वस्थ झाला. आरटीओवाल्यांनी उचलून आणलेल्या इतर रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हरांना आता मोबाइलमध्ये ‘भीम’ टाकून घ्यावा लागेल, पण पैसे कमावूनही आयत्या वेळी मोबाइलमधला भीम ‘चालला’ नाही तर, गोपीनाथ रिक्षावाल्यासारखेच उपाशी राहावे लागेल या काळजीने रामदासच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. कसाबसा तो घरी आला. बायको आणि मुले वाटच पाहात होती.. त्याने अंगावरचा खाकी शर्ट उतरवून खिसा उलटा केला आणि काही न बोलता खाटेवर आडवा झाला. लांबवरच्या झोपडय़ात कुठे तरी गाणे वाजत होते.. ‘समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही!’.. गाण्यातल्या शब्दांत अर्थ असतो, हे रामदासला आत्ता समजत होते..

 

Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम