नवीन वर्षांचे स्वागत जीवघेणे ठरले

औरंगाबाद : भरधाव जाणारी मोटार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन ठार झाले तर तीनजण जखमी झाले. हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास दौलताबाद किल्ल्याजवळ घडला. या अपघातात मोटारीचा पार चेंदामेंदा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सौरभ विजय नांदुरकर (वय २९), वीरभास मुकुंद कस्तुरे (वय ३४) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर नितीन रवींद्र शिरशीकर, प्रतीक गिरीश कापडिया व  मधुर प्रवीण जयस्वाल अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

मंगळवारी रात्री सर्वत्र ३१ डिसेंबरच्या पार्टी  व नवीन वर्षांच्या स्वागताची धुम सुरू होती. सौरभ नांदुरकर, वीरभास कस्तुरे, नितीन शिरशीकर, प्रतीक कापडिया, मधुर जयस्वाल असे पाच मित्र नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी बीएमडब्ल्यू मोटारीने (क्र. एमएच२०-ईएफ-०७०७) खुलताबादला गेले होते. रात्री दोनच्या सुमारास सर्व मित्र औरंगाबादकडे येत असताना भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त मोटार विहिरीच्या बाहेर काढली. मोटारमधील जखमींना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी सौरभ नांदुरकर व वीरभास कस्तुरे यांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.