टेलिव्हिजन विश्वातील आणखी एक जोडी विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता किरण करमरकर आणि अभिनेत्री रिंकू धवन हे १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होणार असल्याचे वृत्त ‘बॉम्बे टाइम्स’ने दिले आहे. किरण आणि रिंकू यांच्यामध्ये बरेच वाद असल्यामुळे हे दोघंही गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, किरण आणि रिंकूला कसे वागावे याची योग्य समज आहे. त्यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, त्यावर कोणताच उपाय दिसत नाही. त्यामुळे मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा मार्ग त्यांना योग्य वाटतो. या दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला असून, त्यांना आता केवळ त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे.

आपल्या खासगी आयुष्यावर रिंकू आणि किरणला कोणतीही चर्चा नको आहे. लोकांमधील चर्चांचा आपल्या मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा समज असल्यामुळे ते त्याची विशेष काळजी घेत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. या मालिकेत त्यांनी भावंडांची भूमिका साकारली होती. त्यावेळी दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी २००२ मध्ये विवाह केला.

‘तमन्ना’ आणि ‘ढाई किलो प्रेम’ या मालिकांमध्ये किरण शेवटचा झळकला. तर, रिंकू ‘ये वादा रहा’ मालिकेत काम करत होती. मात्र, वर्षभरापूर्वी तिने अचानक मालिकेला राम राम ठोकला आणि तिच्या जागी बहिण अशिता धवन गुलबानी तिची भूमिका साकारू लागली.