कल्याण: आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नगरसेवकांना महाविकास आघाडी सरकार पोलिसांच्या माध्यमातून लक्ष्य करत आहे. खोटय़ा गुन्ह्यात अडकवून भाजपची बदनामी करत आहे, असा आरोप करत, भाजपने विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या भाजप नगरसेवकांच्या पाठराखणीसाठी येथील अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगार नगरसेवकांची भाजपकडून पाठराखण करण्यात येत असल्याने या प्रकरणातील तक्रारदार आणि रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपचे कल्याणमधील नगरसेवक सचिन खेमा यांना एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. कुणाल पाटील यांच्यावर दोन दिवसांपूर्वी आडिवलीमधील फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही गुन्हे त्यांच्यावर यापूर्वीच दाखल आहेत. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. हा राजकीय षडय़ंत्राचा भाग असल्याचा खुलासा कुणाल पाटील यांनी केला आहे. एका जमीन फसवणूक प्रकरणात भाजपचे कल्याण पूर्वेतील नगरसेवक मनोज राय यांच्यावर यापूर्वीच कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. येत्या दोन महिन्यांत कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपली ताकद वाढविण्यासाठी आणि भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे. दाखल गुन्हे हा त्याचा प्रकार आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.