वसईतील स्टेट बँकेच्या एटीएममधून २० लाखांची चोरी प्रकरण; दोन आरोपींना पकडण्यात यश विरार : वसई पूर्व वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवडय़ात चार चोरटय़ांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडून २० लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी दोन आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली असून या चोरांच्या शोधासाठी पोलिसांनी सुमारे २ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मूख्य सूत्रधार अद्याप पसार असून ते हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वसई पूर्वमधील सातिवली परिसरातील मोर्या नाका येथे मागील आठवडय़ात सोमवारी मध्यरात्री चार चोरटय़ांनी वीज गेल्याचा फायदा घेऊन एसबीआय बँकेचे एटीएम फोडले होते. त्यामधून सुमारे २० लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्हीच्या चित्रफीत ताब्यात घेतले असता सीसीटीव्हीमध्ये वीजपुरवठा बंद असल्यामुळे चोरटय़ांचा चेहरा दिसला नाही, मात्र चोरीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी दिसून येत होती. याआधारे पोलिसांनी या गाडीचा शोध घेतला असता गाडीचा क्रमांक आरोपींनी बदलला होता. याच गाडीतून मुख्य आरोपींनी हरियाणाला पलायन केले. तर इतर दोन आरोपी मुंबईत असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यानुसार इम्रान खान (३०) आणि उमेश प्रजापती यांना चांदवली परिसरातून अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी वसई विरार ते चांदवली परिसरातील दोन हजारच्या आसपास सीसीटीव्ही तपासले. त्यात चांदवली येथे त्यांना एक आरोपी आढळून आला. त्याचा मागोवा घेत एका इमारतीतून त्यांना अटक केले. मुख्य आरोपी हरियाणा येथे जाण्याच्या अगोदर या आरोपीच्या घरी राहिले होते. मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके हरियाणा येथे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका लग्नात कट शिजला आरोपी हे मुंबईत मजुरीचे काम करत होते. यातील एकाचे हरियाणामधील मुख्य आरोपीशी ओळख होती. महिनाभरापूर्वी त्यांची एका लग्नात भेट झाल्यावर त्याठिकाणी चोरीचा कट शिजवला. मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची गस्त अधिक असल्याने त्यांनी मुंबईत चोरी करायची नाही असे ठरविले. मुंबईत आल्यावर त्यांनी मुंबईच्या आसपासच्या परिसरात रेकी करण्यास सुरुवात केली. त्यांनी ठाणे, मीरा-भाईंदर, मुंब्रा, कळवा याठिकाणी त्यांनी तीन-चार दिवस रेकी केली. यात वसई-विरारमध्ये त्यांना महामार्ग जवळ असल्याने त्यांनी वसई सातिवली परिसराची निवड केली. मुख्य आरोपींना वसई-विरारचे आणि मुंबईचे रस्ते माहीत नसल्याने त्यांनी अटक आरोपींना सोबत ठेवले होते. आणि काम झाल्यावर त्यांना सोडून दिले.