डहाणू : डहाणू शहरातील पारनाका, आगर, डहाणू गाव या भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मातीमिश्रित पाणी येत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

डहाणू शहरासाठी सुजल निर्मल अभियान शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ३० कोटी रुपये खर्च करूनही डहाणू शहराच्या पश्चिमेकडील इराणी रोड, घाचीया, वडकून, आगर, पारनाका, प्रभुपाडा येथील रहिवासी संकुलांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  डहाणू शहरातील रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सन २०१३ मध्ये सुजल निर्मल अभियान शहर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. साखरा धरणातून सरावली सावटामार्गे जलवाहिनी टाकून डहाणू शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डहाणू नगर परिषदेने राबवला. या नुसार मुख्य संतुलित जलकुंभसह डहाणू शहरात मसोली प्रभुपाडा, वडकूण, केटीनगर, लोणीपाडा, सरावली, डहाणू गावठाण असे सहा जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यातील त्रुटी दूर करून डहाणूच्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याविषयी नगराध्यक्ष भरत राजपूत यांना विचारले असता त्यांनी पाण्याचा नियमित पुरवठा सुरू असून पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे सांगितले.

जलशुद्धीकरण यंत्रणेची साफसफाई करूनही दूषित पाणी मिळत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  नगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. -अमित सोरठी, ग्रामस्थ