करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ४ ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले होते. आता हे वर्ग पुन्हा बंद राहतील. राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध धार्मिक सण आणि उत्सवांकरीता सुट्ट्या जाहीर करण्यात येत असतात. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले वर्ग बंद राहतील.