महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यात आसाम व लगतच्या राज्यांमध्ये पुर येऊन मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीवर पावसामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच मध्य प्रदेशात जोरदार पावसामुळे चक्क १४ गाड्या वाहून गेल्याचे समजत आहे. इंदोर मध्ये तुफान पावसामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह पवार यांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खारगाव जिल्ह्यात सोमवारी पावसाच्या पाण्यात १४ गाड्या वाहून गेल्या. बालवाडा पोलीस ठाण्याचा हद्दीतील काटकुट जंगलात सुकडी नदीवर काहीजण पिकनिक साठी आले होते. यात महिला, लहान मुलांसह ५० जण होते. पावसाचा जोर वाढू लागल्याने नदीपात्रातील पाण्यात वेगाने वाढ होऊ लागली, ही परिस्थिती पाहता भांबावून गेलेल्या ५० पर्यटकांनी टेकडीच्या दिशेने पळायला सुरुवात केली. सावधान! टॅटू काढल्याने दोघांना HIV ची लागण, १४ जण पडले आजारी; ‘या’ गोष्टी टॅटू काढताना तपासून घ्या दरम्यान जीव वाचवत पळत असताना अनेकांनी आपल्या गाड्या तशाच खाली सोडल्या होत्या. काही वेळातच पावसाच्या पाण्याने नदीला पूर आला व याच पाण्यात तब्बल १४ गाड्या वाहून गेल्या. परिस्थिती पाहता स्थानिकांनी पोलिसांना बोलावून घेतले व ट्रॅक्टरच्या मदतीने तब्बल १० गाड्या वाचवण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले. या गाड्यांमध्ये पुराचे पाणी गेल्याने अनेक पार्ट निकामी झाले व गाड्या बंद पडल्या. दरम्यान बाकीच्या चार गाड्यांपैकी एक गाडी पुलाच्या खांबापाशी अडकून पडली होती तर अन्य तीन गाड्यांचा पत्ता लागलेला नाही. दरम्यान इंदोरचे महापौर पुष्यमित्र भार्गव सुद्धा बचावकार्याची देखरेख करत घटनास्थळी उपस्थित होते. या भागात पर्यटकांनी जाणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे, स्थानिकांना असे बोर्ड्स सुद्धा लावण्यास सांगितले गेले आहे.