मध्य प्रदेश सरकारने आदि गुरू शंकराचार्य यांचा १०८ फूट उंच पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुतळ्यासाठी तब्बल २००० हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या आठवड्यात आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा केली. स्वामी अवेधाशानंद गिरीजी महाराज यांच्यासह काही संत आणि ट्रस्ट सदस्य या बैठकीला उपस्थित होते. मध्य प्रदेश सरकारच्या ओंकारेश्वर येथे आदि शंकराचार्य यांचा १०८ फुटांचा बहुधातू पुतळा, म्युझियम आणि आंतरराष्ट्रीय वेदांत संस्था उभारणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्य जगाशी जोडले जाईल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह बैठकीत म्हणाले. चौहान म्हणाले की, “ओंकारेश्वर येथे शंकराचार्यांच्या पुतळ्याची स्थापना हा व्यावहारिक जीवनात वेदांत आणणारा प्रकल्प आहे. हे जग एक कुटुंब बनू दे, हा त्यामागचा उद्देश आहे. ट्रस्टच्या सदस्यांनी दिलेल्या सूचनांची राज्य सरकार अंमलबजावणी करेल आणि संपूर्ण कृती आराखडा अंतिम करण्यासाठी वेगाने काम केले जाईल," असं त्यांनी सांगितलं. स्टॅच्यू ऑफ वननेस नावाच्या पुतळ्याची उंची १०८ फूट असेल आणि ती ५४ फूट उंच व्यासपीठावर बसवली जाईल. मांधाता डोंगरावर साडेसात हेक्टर जागेवर हा पुतळा आणि शंकर संग्रहालय उभारले जाणार आहे. नर्मदा नदीच्या पलीकडे ५ हेक्टर क्षेत्रात गुरुकुलम विकसित केले जाईल आणि आचार्य शंकर आंतरराष्ट्रीय अद्वैत वेदांत संस्थान १० हेक्टर क्षेत्रात विकसित केले जाईल. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने या प्रकल्पावर शंका उपस्थित केली आहे. मात्र, सरकार कोणतीही घोषणा करू शकतं जेव्हा राज्याच्या अर्थसंकल्पात यावर निधीची तरतूद केली जाईल, त्यानंतरच त्यावर चर्चा करू, असे कमलनाथ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यावर असलेल्या कर्जाच्या मोठ्या रकमेकडे लक्ष वेधले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पुतळ्यावर हा खर्च अशा वेळी येतोय जेव्हा राज्यावर तब्बल २.५६ लाख रुपयांचं कर्ज आहे. राज्याच्या बजेटपेक्षा राज्यावर असलेल्या कर्जाची रक्कम मोठी आहे. राज्याचे बजेट केवळ २.४१ लाख कोटी आहे. याचा दरडोई हिशोब काढल्यास मध्य प्रदेशमधील प्रत्येक व्यक्तीवर ३४ हजार रुपयांचं कर्ज आहे.