‘वेब सीरिज क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर ‘कारवां’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर इरफान खान आणि दलकीर सलमान हे स्क्रीन शेअर करणार असून हा सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे अभिनेता इरफान खान यावेळी उपस्थित राहू शकत नाहीये. त्यामुळे त्याच्याशिवाय हे प्रमोशन अपूर्ण वाटत असल्याचं नुकतंच मिथीला पालकरने म्हटलं आहे.

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचं संवाद लेखन करणाऱ्या आकर्ष खुराना यांनी ‘कारवां’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचं प्रमोशन करत असून इरफान खान या प्रमोशनला उपस्थित नसल्यामुळे त्याची कमतरता प्रत्येक टीम मेंबरला जाणवत आहे. त्यामुळेच मिथीलाने एक पोस्ट करत इरफानला प्रचंड मिस करत असल्याचं सांगितलं आहे.

‘इरफानच्या आजारपणाची माहिती मिळताच प्रचंड धक्का बसला होता. मात्र ते खंबीर आहेत आणि आमचं प्रेम आणि प्रार्थनादेखील त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे ते लवकर बरे होतील अशी आम्हाला आशा आहे. मात्र एक खंत आहे. ‘कारवां’च्या प्रमोशनसाठी ते हवे होते. त्यांच्याशिवाय हे प्रमोशन पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी चित्रपटाच्या सेटवर प्रत्येकाचं मन जिंकलं होतं.त्यांच्यामुळेच कारवामध्ये जीव आला आहे, त्यामुळे आज ते प्रमोशनला नसल्यामुळे हे प्रमोशन अपूर्ण आहे’, असं मिथीला यावेळी म्हणाली.

दरम्यान, इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर झाला असून त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी इरफानने आजारपणाला कंटाळून एक भावनिक पत्र लिहीलं होतं. त्यानंतर इरफान खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून तो लवकरच भारतात परत येणार आहे अशी चर्चा चित्रपसृष्टीत रंगली होती.