पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत. जम्मू काश्मीरमधील नशरी ते चेनानी असा हा बोगदा तयार करण्यात आला असून या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून जम्मू काश्मीरमधील रस्ते आणि लोहमार्गाचा विकास करण्यावर केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. जम्मू ते श्रीनगरला जोडण्यासाठी नशरी ते चेनानी असा बोगदा तयार करण्यात आला आहे. ९.२८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरला आहे. पाच वर्षांची अथक मेहनत आणि तब्बल ३, ७०० कोटी रुपये खर्च करुन या बोगद्याचे काम मार्गी लागले. या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगरचा प्रवास ३० किलोमीटरने कमी होईल. यामुळे दोन तासांचा वेळ वाचेल. तसेच दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होईल. काय आहे या बोगद्याचे वैशिष्ट्य ? > अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था देशातील सर्वात मोठ्या बोगद्यात सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ ३६० अंशात बघता येतील असे कॅमेरे लावण्यात आले आहेत. > १२४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर बोगद्यात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याशिवाय गाड्यांची संख्या मोजण्यासाठीही ट्रॅफिक काऊंटीग कॅमेरा लावण्यात आला आहे. > आपातकालीन परिस्थिती मिळू शकणार माहिती सुमारे १० किलोमीटर लांब बोगद्यात एफएमवर गाणी ऐकता येतील. एका विशिष्ट फ्रिक्वेंन्सीवरच ही गाणी ऐकता येतील. या फ्रिक्वेन्सीचा फायदा म्हणजे आपातकालीन परिस्थितीत या एफएमवर माहिती देणे शक्य होईल. तसेच मोबाईल आणि इंटरनेट सेवाही या बोगद्यात सुरु राहील यावर विशेष भर देण्यात आला आहे. > एकही वृक्षाची कत्तल नाही भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही वृक्षाची कत्तल करावी लागलेली नाही. स्थानिकांना विशेष प्रशिक्षण देऊन या बोगद्याचे काम करण्यात आले. या बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्यात व्यापार वाढेल. तसेच पर्यटकांनाही याचा फायदा होईल.