मागील दीड वर्षांपासून सुने सुने असलेल्या महाविद्यालयांचे परिसर काल (बुधवार) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा बहरले. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरलेली असली तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून, आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवली जाईल. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने महाविद्यालये सुरू करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत होती. १८ वर्षे पूर्ण केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असूनही महाविद्यालय सुरू नसल्याने त्यांना घरीच राहावे लागत होते. पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर राज्य स्तरावर सूत्रे हलून राज्य शासनाने राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश, क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश, टप्प्याटप्प्याने वसतिगृहे सुरू करणे आदी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.