दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी या मुलीबद्दल ‘अपूर्णाक’ या सदरात ‘लक्ष्मीची सक्षम पावले’ हा ४ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. खरे तर आभार तिच्या माता-पित्यांचे मानायला हवेत, की मुलीला दोन्ही हात नाहीत हे माहीत असतानाही कोणतीही भीती न बाळगता त्यांनी तिला वाढविले, आणि तिच्या जन्मत:च छाटल्या गेलेल्या पंखांना बळ दिले. आणि आज ती लक्ष्मी एवढी सक्षम आहे की परीक्षेला कोणत्याही राइटरची मदत न घेता आपल्या पायांच्या साहाय्याने पेपर लिहून उत्तीर्ण होते आणि तेही उत्तम गुणांनी. आणि तिचे स्वप्न पुढे प्रशासकीय सेवेत जाण्याचे आहे, हेदेखील विशेष. खरं तर ही मुलगी अशा तरुणवर्गासाठी प्रेरणादायी आहे ज्यांच्या मनात सतत एकच प्रश्न डोक्यात घोंगावत आहे, तो म्हणजे ‘स्पर्धा’ हा होय. जेव्हा जेव्हा तुमच्या-आमच्यासारखे तरुण/तरुणी स्पर्धेविषयी (निव्वळ न्यूनगंडाचा) विचार करतील तेव्हा तेव्हा लक्ष्मीसारख्या मुलीच्या परिस्थितीकडे नजर टाकायला हवी. लक्ष्मीसारख्या मुली आज आपल्याकडे काय नाही याचा विचार न करता काय आहे याचा विचार करून पुढे काय करता येईल हे बघतात आणि आपल्या अपंग अवयवांवर अगदी सक्षमपणे ताठ मानेने उभ्या राहतात. अशा मुलींचा अभिमान बाळगावा तितका थोडाच.    – आकाश सानप, सायखेडा (नाशिक)

प्रसन्न करणारे लेख  

४ ऑगस्टची पुरवणी अनेक दृष्टीने वाचनीय व आनंद देणारी होती. सुहास सरदेशमुख यांचा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या छोटय़ा लेखातला ‘मोठा आशय’ आनंददायक होता. त्यांची सुरुवातच अनेक मनांमधील अशांत बेचैनी अवस्था दाखविणारी होती. गेले १५ दिवस वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहणे नको वाटत होते. बस स्टँडवर अनेक चिंतातुर चेहरे दिसत होते. कोणीच त्या ठिकाणी बोलत नव्हते. अशी बोचरी शांतता होती. कॅनमधले ओतलेले दूध पाहून मनाची तडफड होत होती. ऐन पावसाळ्यातल्या या तप्त वातावरणात एकदम प्रसन्न वाटावे अशी ४ ऑगस्टची पुरवणी होती.  सरदेशमुख यांचा लेख वाचल्यावर प्रेम, मानवता, चांगुलपणा, नियत संपली नाही हा दिलासा मिळाला. सारखं नकारात्मक ऐकून व पाहून माणुसकी उरलीच नाही असं कधी कधी उगीचच वाटतं म्हणून अशा सकारात्मक अनुभवाच्या प्रत्यक्ष घटना वृत्तपत्रांनी जरूर छापाव्यात, त्यामुळे जगात चांगल्याही घटना होत असतात याची माहिती मिळते. राजेश आजगावकर यांनी लिहिलेलं ‘कुलूप’ मनाचं कुलूप सर्वानाच उघडायला मदत करणारे आहे. सविता प्रभुणेंनी ‘चार दिवस प्रेमाचे’मध्ये १० भूमिका केल्या, अशा लेखांमुळे अभिनेत्रीच्या गुणांचे अनेक पैलू समजतात.      – सीमाताई रिसबूड, औरंगाबाद</strong>