जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘कर्करोगाच्या पलीकडे’ हा लेख खूपच छान आहे. कर्करोगाविषयी असलेली भीती इतकी खोलवर आहे की, त्या भीतीला बाजूला करण्यासाठी ‘जनजागृती’ आवश्यक आहे. आपण दिलेल्या उदाहरणावरून या जनजागृतीस चालना नक्की मिळेल. लवकर निदान होणे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यावर जरूर ती शस्त्रक्रिया करून जरुरीप्रमाणे केमोथेरपी आणि रेडिओथेरपी करून घेऊन कर्करोगमुक्त होऊ  शकतो हा विश्वास रुग्णात निर्माण होणे गरजेचे आहे. वरील सर्व उपचार सुरू असताना मनाचा खंबीरपणा, कुटुंबातील सर्वाकडून जरुरीप्रमाणे मानसिक आधार आणि वेदनारहित राहण्याकरिता भूलशास्त्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने वेदनेवर प्रभावी उपाय करून घेऊन कर्करोगी पूर्ण क्षमतेने आपले वैयक्तिक आयुष्य आणि आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य जबाबदारीने स्वीकारून पूर्ण क्षमतेने उर्वरित आयुष्य जगू शकतो, हे सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

डॉ. किरण भिंगार्डे, कोल्हापूर

मुलींबाबत देश मागासलेलाच

‘कौमार्य चाचणीची ऐशीतैशी!’ हा २७ जानेवारीला प्रसिद्ध झालेला प्रियंका तमाईचेकर यांचा लेख वाचला. भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, आपले यान मंगळावर, चंद्रावर घिरटय़ा मारून परत आले आणि आम्ही पुरुषप्रधान संस्कृतीमधील माणसे पुराणकालात वावरत आहोत, असे वाटते. एक विदारक सत्य समाजापुढे आणले, त्याबद्दल प्रियंकाचे कौतुक करावेसे वाटते. एकच सांगावेसे वाटते, शिक्षणात आजदेखील मुलींना डावलले जाते. ज्या देशाने पन्नास वर्षांपूर्वी महिला पंतप्रधान जगाला दिली, तो देश महिलांबाबत एवढा कसा मागासलेला राहिला? ‘मुलगी झाली, देशाची प्रगती झाली’ ही घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे.

शिल्पा पुरंदरे, मुंबई

बदलाचा प्रारंभ स्वत:पासून करा

‘कौमार्य चाचणीची ऐशीतैशी! हा प्रियंका तमाईचेकर यांचा मती गुंग करणारा, विचार करण्यास प्रवृत्त करणारा वास्तवदर्शी, निर्भीड असा लेख वाचला. कंजारभाट समाजात स्त्रीची कौमार्य वा योनिशुचिता तथा व्हर्जिनिटी चाचणी लग्नाच्या पहिल्या रात्री घेतली जाते. अमानवीय आणि निर्बुद्धतेचे प्रतीक असलेल्या कुप्रथेविरुद्ध, त्याच कंजारभाट समाजातील काही तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे. ही गोष्टच मुळी खूप महत्त्वाची आणि म्हणूनच समस्त समाजाने दखल घेण्याजोगी आहे. स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक शोषण अशा कुप्रथांच्या आडून होत आले आहे. अशा प्रकारच्या विचित्र आणि विवेकशून्य कुप्रथांचा उगमच मुळी आपल्या पुरुषप्रधान- पुरुषसत्ताक अशा सामाजिक जडणघडणीत झाला आहे, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. मुलगी व्हर्जिनच हवी अशी अपेक्षा आणि आग्रह असणारा असा हा आधुनिक वर्ग मात्र मुलगा व्हर्जिन आहे किंवा नाही याचा काहीही ठोकताळा, रुजवात ठेवत नाही. जुन्या विचारांना मूठमाती देण्यापेक्षा नवीन विचार आत्मसात करणे जास्त अवघड असते. तरीही बदलाची सुरुवात स्वत:पासून केली तर ती जास्त फलदायी ठरते, स्वत:साठी आणि पुढील पिढय़ांसाठीदेखील. कंजारभाट समाजातील तरुणांनी या बदलाची सुरुवात केली आहे आणि आपण एक समाजघटक म्हणून या ‘बदलाचे’ स्वागत करायला पाहिजे.

बाळकृष्ण शिंदे

आठवणींचा कप्पा

‘कालकुपी’ हा २० जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेला प्रतिमा कुलकर्णी यांचा लेख वाचनात आला. खूप सुंदर आणि जुन्या आठवणी जागवणारा लेख आहे. लेख वाचून माझे मन भूतकाळात रमले. नंतर मग कपाट उघडून एक-एक जपून ठेवलेल्या वस्तू पाहावयास सुरुवात केली. असंख्य आठवणींची मनात गर्दी झाली. लहानपणी आई-बाबांनी काढलेले फोटो, शाळेतील गुणपत्रक, मित्रांनी वाढदिवसाला दिलेले भेटकार्ड, सहलीला गेलो असता काढलेले फोटो, केलेला दंगा, मौजमजा, सुंदर हस्ताक्षराच्या जपून ठेवलेल्या वह्य़ा आणि त्यावर शिक्षकांनी दिलेला सुंदर अभिप्राय. खरे सांगू, इतके मस्त वाटले, पुन्हा जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. मानवी आयुष्याला परमेश्वराकडून मिळालेल्या देणगीपैकी एक म्हणजे आपले मन. त्यात आपण कितीही सुंदर आठवणी जपून ठेवू शकतो. मोबाइलसारखं नाही आपलं मन, की मेमरी कार्ड फुल झाल्यावर जास्त माहिती साठवून ठेवू शकत नाही आणि आठवणी पुसून जाण्याची भीतीपण नाही. मस्त आहे ना! बस्स डोळे मिटा अन् काही क्षणांतच ती आठवण डोळ्यासमोर येते, अगदी जशीच्या तशी. अशा छोटय़ा-मोठय़ा आठवणींनी आयुष्य सुंदर बनतं. येथे कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात, ‘आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकटय़ानेच ते फुलवत राहा, वादळात सगळं वाहून गेलं, म्हणून रडत बसू नका, वेगळं असं काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका..’

अक्षयकुमार शिंदे, सांगली