भक्ती बिसुरे यांनी १३ ऑक्टोबरच्या अंकात लिहिलेला ‘देणे समाजाचे’ हा वीणा गोखले यांच्यावरील लेख वाचला. त्या करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली. आजच्या काळात, ‘मी व माझे कुटुंब’ अशी संकल्पना दृढ होऊन मनुष्य आत्मकेंद्री झालेला आहे आणि तो स्वत:साठीच जगताना दिसतोय. अशा परिस्थितीत समाजासाठी सर्वस्व अर्पण करून समाजासाठीच जगण्याचा ध्यास घेणारी त्यांच्यासारखी माणसं दिसली म्हणजे चमत्कार वाटतो. यातून जगातील चांगुलपणावरील विश्वास दृढ होण्यास मदत मिळत असते. नवीन पिढीसाठी आशेची किरणे तयार करण्याचे वातावरण त्यांच्यासारखी माणसं तयार करीत असतात, याचा खूप आनंद वाटतो.

– ज्ञानेश्वर सुडके, पुणे</strong>

लोकशिक्षणाची गरज

‘अंधश्रद्धेच्या जटेतून सुटका’ हा १३ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेला नंदिनी जाधव यांच्यावरील लेख वाचून त्यांचे अंधश्रद्धेच्या क्षेत्रातील कार्य किती महत्त्वाचे व गरजेचे आहे, हे समजले. डॉ. नरेंद्र दाभोलकर सरांचे कार्य किती श्रेष्ठ होते आणि आहे, हे आपल्याला समजलेच नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

‘मुलाचा हव्यास’ हा डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेला लेख वाचला, खूप आवडला. मुलगाच हवा या हव्यासासाठी, लोक काय काय करतात, हे घटनासह दाखवून दिले आहे. सुशिक्षित लोक या गोष्टींबाबत अपवाद नाहीत. हेही आपण पाहतो. अशा रूढी प्रथा-परंपरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे.

– ब. रा. कदम, पनवेल</strong>

चापेकर यांच्यामुळे नृत्याला प्रतिष्ठा

‘श्रेयस आणि प्रेयस’ या सदरात २० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. सुचेता चापेकर यांचा लेख खूपच आवडला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात नृत्याला प्रतिष्ठा मिळाली. आज समाजातील सर्वच घरांतून मुली अभिमानाने नृत्य शिकायला आणि सादरीकरणाला जाऊ  शकतात. अभिजात नृत्यपरंपरा डॉ. चापेकर यांनी जपली

वाढवली आणि प्रतिष्ठित केली. त्यासाठी आम्ही ऋणी आहोत.

– स्मिता घाटे

उत्तम लेखमाला

मी ‘लोकसत्ता’चा गेले कित्येक वर्षांचा नियमित वाचक आहे. त्यातील अनेक लेख मला विचार करायला लावतात. त्यामधील डॉ. रोहिणी पटवर्धन यांची ‘संहिता साठोत्तरी’ ही लेखमालाही आहे.

– अरविंद वि. मराठे

लेखिकांचे साहित्य विश्व

वर्धापन दिनानिमित्त २९ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेली पुरवणी अप्रतिम तयार झाली आहे. विविध भारतीय भाषांतील लेखिकांचे साहित्य विश्व महिला समीक्षणकार उत्तमरीतीने उलगडून दाखवले आहे. संपूर्ण पुरवणी स्त्रीची भूमिका विविधांगाने मांडते. कुटुंबात समाजात वावरताना स्त्रीची ससेहोलपट समंजस पण विस्ताराने दाखवली आहे. घरातील व्यक्तीची स्त्रीला समान स्थान आणि संधी देण्याची भूमिका एकेक लेखिका घडवत असते. बंडखोर वृत्तीने लेखिका घडत असली तरी माणुसकी सोडत नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाते नवीन पिढी घडवते संस्कार सोडत नाहीत कारण मर्यादा पूर्वापार चालत आलेल्या. परंपरेतून सुद्धा नवीन निर्माण केले. घरातील पुरुषाची सुधारकी वृत्तीमुळे अनेक स्त्रियांनी वेगळी उंची गाठली आणि सनातनी वृत्तीमुळे बंडखोरी केली. म्हणून समाजने वाळीत टाकलं तरीही मुक्ताबाई भावंडांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. नवीन विचार दिले आणि सर्वधर्मसमभाव सांगितला. स्त्री जातीची ही आदिम काळापासून चालत आलेली प्रेरणा अनेक पिढय़ा समृद्ध करीत आली आहे.

– दिनेश कुलकर्णी,  अहमदनगर</strong>

प्रेरक उपक्रम

‘आरोग्यदायी अन्नाची लोकचळवळ’ हा २० ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेला नीलिमा जोरवर यांचा लेख वाचला. लेखिकेने केलेले कार्य कौतुकास्पद आहेच त्याशिवाय सकस अन्नपदार्थनिर्मिती आणि वितरणासाठी केलेले प्रयत्न मोठे आहेत. शेतीतून चांगले उत्पन्न पर्यावरण संरक्षण असे अनेक फायदे पाहता कृषिक्षेत्राला नवीन उभारी मिळू शकते. शेतीत काही राहिले नाही, अशी तक्रार असते. दुष्काळ, हवामान बदल, हमीभाव नसणे असे अनेक प्रश्न भेडसावत असताना असे उपक्रम अनेकांना प्रेरक ठरू शकतील, असे निश्चितपणे वाटते.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक