04-lp-cvr ‘लोकप्रभा’च्या ४३व्या वर्धापन दिन अंकातील महाभारताची कालनिश्चिती हा डॉ. मधुकर ढवळीकर आणि महाभारताचा भाषाशास्त्रीय ताळा हे दोन्ही लेख वाचले. डॉ. मधुकर ढवळीकर यांनी प्रलयकाळ, मनु-मासा ही कथा, तत्कालीन जनतेच्या संपर्कातील प्राणी, वापरातील वस्तू इ.च्या मदतीने काढलेल्या निष्कर्षांनुसार महाभारताचा काळ इ. सन पूर्व ८०० ते ९०० वर्ष असा आहे. तर डॉ. अरविंद जामखेडकरांनी ‘भाषा शास्त्रीय ताळा’ निकष वापरून आपले निष्कर्ष मांडले आहेत. वाचकांना ‘काही तरी’ निष्कर्षांप्रत येण्यासाठी मार्गदर्शक, असे विवेचन मात्र ‘मथितार्थ’मधून विनायक परबांनी मुद्देसूद पण अतिशय सविस्तर केले आहे. केवळ मथितार्थ वाचूनदेखील, संशोधनातील संदर्भासह, तज्ज्ञांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांचे आकलन होऊ शकेल.

कालनिर्णयासाठी, प्रलय काळाचे निश्चित वर्ष ठरविण्यासाठी, झाडाच्या खोडाच्या आत सापडणाऱ्या वर्तुळांचा मार्गदर्शक पुरावा देणाऱ्या बेल्जियमच्या तज्ज्ञांचा उल्लेख खास! वाचकांच्या माहितीसाठी, देहराडून येथील राष्ट्रीय फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये असा एक खराखुरा, कापलेला बुंधा ठेवला आहे ज्यावर प्रत्येक वलय स्पष्ट दिसते, त्यावरून त्या झाडाचे वय आणि त्या त्या वर्षीच्या वातावरणाचा अंदाज घेतला जातो. पर्यटकांनी देहराडूनला गेल्यावर एफआरआयला भेट देऊन तो बुंधा अवश्य पाहावा.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाभारत युद्धाचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न अमेरिकेतील भौतिकशास्त्र विभागाच्या बी. एन. आचार्य यांनी खगोलशास्त्राच्या एका सॉफ्टवेअरच्या मदतीने केलेला आहे त्याचा उल्लेख अप्रस्तुत ठरू नये. महाभारतातील युद्धाच्या काळात तेरा दिवसांमध्ये एक चंद्रग्रहण व एक सूर्यग्रहण अशी दोन ग्रहणे झाली होती. त्या वर्णनावरून, त्या वेळच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून, महाभारत युद्ध काळ ख्रिस्त पूर्व २२-११-३०६७ ला सुरू होतो असा अंदाज व्यक्त केला आहे. एस. रंगनाथन नावाच्या आणखी एका संशोधकाने १९६९ साली अशाच स्वरूपाचा निष्कर्ष काढला होता. बायबल मध्ये उल्लेख केलेला नवीन जगाच्या निर्मितीचा काळ, महाभारतात उल्लेख असलेला प्रलय काळ, मनु आणि मासा कथा यांचाही काळ अनुक्रमे इसवीसन पूर्व ३१०० आणि ३१०२ आहे तसेच कलियुगाची सुरुवातही याच्या आगे मागेच आहे. ढवळीकरांच्या संशोधनात उल्लेखलेला मनूचा काळ २२८५ या तारखेच्या जवळपासच जातो.

पुराणात ब्रह्मा-विष्णू-महेश या देवतांचा उल्लेख आहे. परंतु महाभारत काळातील कुंती आणि माद्री यांनी मुले होण्यासाठी यम, पवन आणि इंद्र या देवांची आराधना केली. ही दैवते वैदिक काळातील आहेत. सर्वात प्राचीन मुखोद्गत परंपरेचा जागतिक बहुमान मिळालेल्या ऋग्वेदाचा काळ इसवीसन पूर्व २००० च्या आसपास जातो हे आता जवळ जवळ सर्वमान्य झाले आहे. महाभारत काळ इसवीसन पूर्व ९०० च्या मागे नेणारा हा एक उल्लेख आणि दाखला!
– अनिल ओढेकर, नाशिक

05-lp-cvrपुन्हा जेएनयू…
‘हैदराबाद ते जेएनयू एका स्वप्नाच्या शोधात’ हे प्रासंगिक  (लोकप्रभा, १ एप्रिल) वाचले. विद्यापीठ जर मानवतावाद- सहिष्णुता आणि मानवजातीच्या कल्याणासाठी सत्याच्या – नवनवीन कल्पनांच्या साह्यच्या शोधासाठी आहे (पं. नेहरूंचे वक्तव्य) तर नेहरू आपल्या पूर्ण जीवनात असे वागल्याचे दिसतच नाही. विद्यापीठातून सर्व पक्षांच्या वैचारिकतेची चर्चा होण्यास हरकत नसावी. ‘वादे वादे जयते’ हे विद्यापीठापासूनच शिकवले जावे. तरच मुद्दय़ावरून गुद्दय़ावर येण्याचा प्रसंगच येणार नाही. चर्चेला-वादविवादाला आपण का घाबरावे? आपली परंपरा तशी नाही.

डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्यांनी तर आत्महत्येचा विचार स्वप्नातही आणू नये. एवढी संघटना पाठीशी असता रोहित वेमुलाने आत्महत्या करणे शोकदायक. त्याच्यासारखे लाखो हजारो विद्यार्थी देशात आहेत याचा विसर त्याला कसा पडला?

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर दलितांवर अत्याचार होतात हे लाजिरवाणेच. टीम कन्हैयाच्या देशद्रोही घोषणांच्या आणि रोहितच्या आत्महत्येची जोडणी करण्याचे कारण नाही. लाल सलामवाले स्टॅलिनची हिटलर- मुसोलिनीबरोबरची युती- तिआन-मेन-स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांच्या रक्तमांसाचा चिखल कसा विसरले?
– सूर्यकांत शानभाग,  बेळगाव

06-lp-cvrमाया पातळ झाली
दि. १ एप्रिल, २०१६ ‘लोकप्रभा’तील ‘पण बोलणार कोण?’ मथितार्थ तसेच ‘इतकं सगळं आलं कुठून?’ कव्हरस्टोरी आपल्या देशातील राजकारणी मंडळींच्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकते. छगन भुजबळांच्या बाबतीत जाणते राजे शरद पवार साहेबांनीच बोललं पाहिजे, कारण ते भुजबळांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असे नेते आहेत. राष्ट्रवादीत सत्तापदावर असतानाच भुजबळांकडे इतकं सगळं घबाड आलं आहे. ‘भाकरी’साठी राज्यातील शेतकरी दररोज मरणाला कवटाळीत आहेत. अनेक ‘महाल’ उभे करणारे भुजबळ राष्ट्रवादीतच गडगंज झाले आहेत. काँग्रेस संस्कृतीत असे भुजबळ अनेक आहेत. भुजबळांपेक्षाही अधिक श्रीमंत आहेत. राष्ट्रवादीला महाभ्रष्टवादी म्हणणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवारांना भेटण्यासाठी बारामतीला जातात. अर्थमंत्री अरुण जेटलीही बारामतीचा आदर्श जोपासतात. सर्व भ्रष्टाचारींना शरद पवार सदैव पाठिंबा देतात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. भुजबळांचे दुर्दैव आहे. शरद पवार नेता असताना त्यांना तुरुंगात जावे लागले. ‘माया’ पातळ झालेली दिसते. तेलगी प्रकरणातून वाचल्यानंतर भुजबळांनी हावरटपणा सोडला नाही. सत्तेचा माज दाखविला. कृतघ्नपणाही केला. कर्माची फळे भोगावीच लागतात. सर्वच राजकीय पक्षांत भुजबळांपेक्षा शेकडो पटीने श्रीमंत आहेत.
– आर. के. मुधोळकर, नांदेड.

म्हणून बदकं पाळली जात नाहीत
दिनांक २५ मार्चच्या अंकातील अशोककुमार कानेटकर यांचे ‘बदक आणि कोंबडी तुलना’ हे पत्र वाचनात आले. सदर पत्रात त्यांनी बदकाची अंडी व मांसाबद्दल काही मते मांडली आहेत. त्यापैकी बदकाच्या मांसाची धर्मनिहाय/ जातीनिहाय वाटणी झाली आहे, असे त्यांना वाटते ते तितकेसे बरोबर नाही. कारण प्राचीन भारतात उकिरडय़ावर अन्न वेचणारे, कृमीकीटक खाणारे पक्षी म्हणून कोंबडी, बदक दोघांनाही त्याज्य मानण्यात येत होते, त्यामुळे एखाद्या विशिष्ट जातीधर्माशी सदर पक्ष्यांचे मांस खाण्यासंबंधी तसे दाखले देता येत नाहीत. बदकांना हिरवा चारा आवडतो हे त्यांचे निरीक्षणानुसार मत असले तरी सरसकट सगळीच पाळीव बदके अशा पद्धतीचा शाकाहार करीत नाही. त्यांना खायला शक्यतो मासे लागतात. तसेच काही रानबदकांच्या जाती मिश्र पद्धतीचा आहार करतात. त्यांच्या अन्नात मासे, पाणीकीटक याबरोबरच पाणवनस्पतींचे कोवळे कोंब आणि कंद असतात. बदकाचे मांस खूप पूर्वीपासून भारतीयांच्या आहारात आहे. मुघल काळात मुघलांच्या खाण्यात बदकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असे. मुघल बादशहा बाबर याने आपल्या रोजनिशीत भाजलेल्या बदकाच्या मांसाचा उल्लेख केला आहे तसेच ‘आईन – ए- अकबरी’ या ग्रंथात बदकांच्या काही पाककृती ही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अकबर राजाच्या मुदपाकखान्यात खास काश्मीरहून बदकं आणून शिजवली जायची असा उल्लेख आहे. मुघल काळ आणि ब्रिटिशांच्या राजवटीत बदकाच्या मांसाला व अंडय़ांना चांगली मागणी होती हे सत्य मात्र आपल्याला नाकारता येणार नाही, पण सद्यस्थिती पाहिली तर सध्याच्या ‘इन्स्टंट’ जमान्यात कमी खर्चात बॉयलर कोंबडय़ांचे उत्पादन घेतले जाते. बंदिस्त स्वरूपातील कुक्कुटपालन हा एक नफा देणारा व्यवसाय आहे, पण त्यामुळे गावठी, देशी कोंबडय़ांचे वाण दुर्मीळ होऊ लागले आहेत. इमू पक्ष्यांचा मांस, अंडी, पिसे, चरबी असा आकर्षक व्यवसाय महाराष्ट्रात फारसा तग धरू शकला नाही. बदकपालनाच्या बाबतीतही पुरेशी जागा, पाण्याचा हौद, खाद्यासाठी मांसे अशा गोष्टींची आवश्यकता असते. शिवाय बाजारपेठेतही बदकांच्या उत्पादनाला मागणी हवी, सध्या काही ठिकाणी कृत्रिम तलाव, तळी यांमध्ये हौस म्हणून पांढरी बदकं पाळली जातात.
-सुहास बसणकर, दादर, मुंबई.

07-lp-cvrहनीमून स्पेशल आवडला
‘हनीमून स्पेशल’ २५ मार्च २०१६ चा अंक अगदी मनाला भावणारा होता. हटके पर्यटन व तेही पूर्ण माहितीसह खूपच अप्रतिम व वाचनीय असा अंक आहे. बोरकर यांचा लेख परत मनाला भावून गेला. त्यांची वर्णन करण्याची भाषा खरोखरच सुंदर, पाल्हाळ नाही की कठीण, क्लिष्ट नाही. इतर लेखक-लेखिका रमेश पाटील, शैलेंद्र कुलकर्णी, नीता काळे, यशवंत चव्हाण, धनराज खरटमल, इत्यादींनी अंकात छान भर टाकली. संग्रही ठेवण्यालायक अंक. म्यूनिक ते व्हेनिस आम्ही युरोप पाहून आलेल्यांच्या स्मृती जागृत झाल्यात. साद- प्रतिसाद डॉ. मीनल कातरणीकर यांचा आनंद देऊन गेला.
– प्रभाकर खरवडे, नागपूर.

निगुतीने शब्दपेरणी
‘निंबोणीच्या झाडाखाली..’ आवडले. लेखिकेच्या आजीचे संदर्भ भावले. लेखिकेने अगदी नकळत ‘निगुतीने’ हा शब्द आसमंतात पेरला. विसरत चाललेले शब्द मराठीत आपल्यासारखे लेखक निगुतीने पेरतात, खारूताईसारखे! खारूताई खूप विसराळू आहे. बिया शोधून शोधून काढते, नंतर खाऊ  म्हणून जमिनीत लपवते नि विसरून जाते कुठे लपविली ती बी! असे करीत करत वर्षभरात ती एक लक्ष बिया पेरते. जंगलात झाडे कोण लावत असेल तर ती खारूताई. आपणही ‘निगुतीने’सारखे छान शब्द पेरत आहात आपल्या लेखनात.
– संघर्ष सावरकर, अकोला.