07-lp-cover‘थेट जेएनयूमधून’ हा सुयश देसाई यांचा लेख वाचला. त्यांच्या लेखातून डाव्यांबद्दल घृणा आणि अभाविपबद्दलची आपुलकी स्पष्टपणे बाहेर येते. आपण कसे निरपेक्षपणे लिहीत आहोत असा त्यांचा रोख असल्याने हे सांगणे आवश्यक वाटले. त्यांच्या या लेखाच्या निमित्ताने काही मुद्दे मी इथे मांडू इच्छितो. मी जेएनयूचा विद्यार्थी नसलो तरी त्या काळात मी जेएनयूमध्ये होतो आणि राजकारणाशी संबंध नसणाऱ्या माझ्या काही मित्रांशी बोलूनच मी हे लिहीत आहे, हे मी इथे नमूद करू इच्छितो.

९ फेब्रुवारीला ‘द कन्ट्री विदाऊट पोस्ट ऑफिस’ असा कार्यक्रम डीएसयूनामक विद्यार्थी संघटनेने ठेवला होता. या संघटनेची ताकद हातावरील बोटे मोजण्याइतकीच आहे. कार्यक्रमाला फार उपस्थिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. प्रशासनानेदेखील या कार्यक्रमाला परवानगी नेहमीप्रमाणे दिली होती. अभाविपने जेएनयू प्रशासनाकडे हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करून अन्यथा हा कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली, तेव्हा या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. जेएनयू प्रशासनानेही मग कार्यक्रम सुरू होण्याअगोदर १० मिनिटे परवानगी नाकारल्याचे फोन करून सांगितले. यामुळे प्रकरण आणखी चिघळून कार्यक्रमाच्या ठिकाणी डीएसयू समर्थक आणि अभाविप कार्यकर्ते यांत बाचाबाची झाली. त्यातच जेएनयूएसयू ही तसेच कन्हैया जिचा अध्यक्ष आहे त्या सर्वानी मिळून एक मोर्चा काढून प्रशासनाने अशा पद्धतीने अभाविपच्या दबावाला बळी पडून कार्यक्रम बंद पाडायला नको होता अशी भूमिका घेतली. जेएनयूएसयूचे म्हणणे होते की, जर अभाविपलाला डीएसयूच्या कार्यक्रमाबद्दल आक्षेप होता तर ते तसे पत्रक काढून विद्यार्थामध्ये वाटावे किंवा आपले म्हणणे मांडणारा दुसरा कार्यक्रम आयोजित करावा. या भूमिकेत चुकीचे काय आहे? हे बोलताना आवेग आणि चीड असणारच की. जिथे कित्येक वर्षे विद्यार्थी निवडणुकांवर बंदी आहे, त्याला ते उचकवणारे वाटणे स्वाभाविक आहे.

तिथे काही भयानक घोषणा झाल्या तर मग तिथे असणाऱ्या पोलिसांनी का नाही लगेच अटक केली त्या घोषणा देणाऱ्यांना? दुसऱ्या दिवशी या विषयावर सर्व दृश्य माध्यमांमध्ये याविषयी चर्चा घडविण्यात आली. बऱ्याच पत्रकारांनी आपली पत्रकारिता बाजूला सारून आपल्या राष्ट्रवादी असण्याचा आटापिटा केला व त्यात जेएनयू आणि विद्यार्थी यांना राष्ट्रद्रोही घोषित करून राष्ट्रवादाचा डंका वाजवण्यात आला. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लावण्याची क्लृप्ती सरकारला त्यानंतर आली. विद्यापीठाच्या कमिटीमार्फत या घटनेची शहानिशा करू दिली असती आणि त्यानंतर जर सरकारने आपली कृती केली असती तर हा मुद्दा एवढा मोठा झालाच नसता. पण इतके शहाणपण सरकारला आहे हे मला वाटत नाही. निष्कर्ष सरकारने आणि मीडियाने हा विषय मोठा केला.

सुयश देसाईंचा दुसरा आरोप असा आहे की, कन्हैयाचे ११ फेब्रुवारीचे भाषण हे मुद्दामहून स्वत:च्या बचावासाठी केले होते. यातही ते हे विसरत आहेत की या भाषणानंतर त्याच्यावर आरोपपत्र ठेवले गेले तसेच या भाषणातील आझादीच्या घोषणा बदलून त्यानेही देशविरोधी घोषणा दिल्याची खोटी अफवा पसरविण्यात आली. याबद्दल लेखकाचे म्हणणे काय आहे.. ‘द कन्ट्री विदाऊट पोस्ट ऑफिस’ हे गुगलमध्ये जरी टाकून पाहिले तर त्याचा आणि काश्मीर, अफझल, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा संबंध काय आहे हे लेखकाला कळेल.

दुसरे म्हणजे डाव्या विचारी संघटनांनी कशी चतुर, चलाख भूमिका घेतली याबद्दलही लेखकाने जी विधाने केली आहेत. यात चतुराईचा काय संबंध? ते वैचारिकदृष्टय़ा डीएसयूच्या भूमिकेशी सहमत नाहीत. पण तरीदेखील ते उमर आणि इतर विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीतच होते. याला चतुराई नव्हे, वैचारिक परिपक्वता म्हणतात. शेवटचा मुद्दा, कन्हैयाला डाव्या संघटनांनी किंवा जेएनयूतील शिक्षकांनी नाही तर आजच्या दृश्य माध्यमांनी मोठा केलाय. तसेच हा मुद्दा मोठा केलाय सरकारने आणि त्यांच्या समर्थकांनी. निवडणुकीत या राष्ट्रवादाचा वापर कसा करता येईल याची खेळी चालू आहे.
– रवि कदम, ई-मेलवरून.

08-lp-coverआजच्या काळात मनोजकुमारची थीम
मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आणि त्याबाबत बरीच टीकाटिप्पणी झाली. ती करणारे हे विसरलेच की त्याच्या रहस्यमय कथानकांवरील चित्रपटांना तिकीट खिडकीवर भरघोस यश लाभले होते!

मनोजकुमारचे खरे नाव हरिकिशन गोस्वामी! त्याचा आवडता नायक ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हा होता. दिलीप कुमारच्या एका चित्रपटातील पात्राच्या नावावरूनच त्याने स्वत:ला मनोज कुमार हे नाव घेतले. त्याचा पहिला हीट चित्रपट संगीतमय ‘हरियाली और रास्ता’ हा! यानंतर त्याने बरेच हीट चित्रपट दिले. राज खोसला यांनी ‘वह कौन थी’  या रहस्यप्रधान चित्रपटाकरिता मनोजकुमारला नायक म्हणून घेतले. हा चित्रपट जबरदस्त हीट ठरला आणि यानंतर मनोजकुमारकडे अशा चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. अनिता, गुमनाम इत्यादी चित्रपट हीट झाले आणि मनोजकुमारवर रहस्यमय चित्रपटांचा नायक असे लेबल लागले. अशा रहस्यमय चित्रपटांचा एक ठरलेला साचा असायचा. संपत्ती वा बदला घेण्याच्या कारणाने नायकाचा खात्मा करण्याचा खलनायक व त्याच्या कंपूचा डाव! तो कसा? तर, एखादी काल्पनिक भुताटकी त्याचे मागे लावायची. ती त्याला जीव देण्यापर्यंत घेऊन जायची आणि नंतर तीच त्याला जीव देण्यापासून अडवायची. कारण, या नाटकात त्याला अडकविताना तीच त्याच्या प्रेमात गुंतून गेलेली असायची. मनोजकुमारने अशा चित्रपटातील नायकाच्या बऱ्याच भूमिका केल्या आहेत. तो शोभायचाही! हल्ली रहस्यमय चित्रपट निघणे बंद झाले आहे. मात्र, सध्या झी मराठी टीव्हीवर रोज रात्रौ साडेदहा वाजता प्रसारित होत असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत भुताटकीसारखा रहस्यमय प्रकार दाखविला जात आहे. पुढे काय होईल ही उत्सुकता ठेवून प्रेक्षक रोज ही रहस्यमय मालिका बघत असून त्याच त्याच कौटुंबिक मालिका बघून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ही मालिका स्वत:कडे गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. आता, या मालिकेमुळे अंधश्रद्धा बळावत आहे वा नाही, हा भाग वेगळा! ही मालिका बघत असताना मनोजकुमार अभिनित वह कौन थी, अनिता इत्यादी चित्रपटांची आम्हाला आठवण होत आहे. थोडा फार फरक वगळता थीम त्याच वळणाची दिसते, म्हणून!
– वसंत खेडेकर, किल्ला नगर, बल्लारपूर, चंद्रपूर</strong>

09-lp-coverसंस्कार हीच पायाभरणी…
‘उज्ज्वल भविष्य पेलतो आम्ही’ (सा. लोकप्रभा २९ जानेवारी) वाचला आणि आजच्या युवकांबाबत प्रखर मत मांडून युवकांच्या डोळ्यात जे झणझणीत अंजन टाकले त्याबाबत धन्यवाद. तद्वतच पालक व आई-वडिलांना बालपणातील संस्कार व नीतिमूल्याच्या पालनाबाबत जो उपदेश केलेला आहे तोही अभिनंदनीय आहे.

राजा, महाराजा व थोर सुधारकांचे नाव घेऊन आपली पोळी भाजणारे देशात व राज्यात अनेक  आहेत. मात्र आपली पोळी भाजत असताना हेच महाशय थोरामोठय़ांना व समाज सुधारकांना विसरतात हे वास्तवही प्रस्तुत लेखात रेखाटून युवकांना जागृत केल्याबद्दल धन्यवाद.

युवक ही या महान व विशाल राष्ट्राची खरी संपत्ती आहे. यासाठी युवकांना आई-वडील व शाळा-महाविद्यालयांतून, शालेय अध्यापनातून सुसंस्काराचीही जोड देऊन सामाजिक बांधिलकी, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्तीचे पाठ दिले तर हे युवक उद्याच्या या राष्ट्राची सक्षम, सुदृढ व निकोप उभारणी करण्यासाठी कटिबद्ध होतील एवढे निश्चित.

पालकांनीही पाल्याची लहानपणापासूनच योग्य ती काळजी घेऊन त्यांना बालपणातच योग्य व दिशादर्शक मार्ग दाखवून विधायक व रचनात्मक कार्याची आवड निर्माण करायला हवी.

बालपण हे अनुकरणप्रिय व संवेदनशील वय असते. बालपणातील योग्य व दिशादर्शक संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. यासाठी पालकांची भूमिका पाल्य-पाल्यासाठी अत्यंत महत्त्वाची, आवश्यक व प्रभावी असते याचे भान पालकांनी ठेवल्यास देशाची सक्षम उभारणी होऊन जगात आपला देश युवकांचा देश म्हणून निश्चित उभा राहील.
– धोंडीराम सिंह राजपूत, औरंगाबाद</strong>

10-lp-coverईश्वरनिष्ठा आणि देवभोळेपणात फरक
२६ फेब्रुवारी २०१६ च्या लोकप्रभा अंकातील प्रकाश बेंद्रे यांच्या ‘देवांना रिटायर करणे उचित!’ हा लेख वाचला. देवभोळेपणा आणि ईश्वरनिष्ठ असणे यात फरक आहे. डॉ. राजेंद्र सिंग (जलपुरुष), प्रकाश आमटे, नाना पाटेकरांची नाम संघटना अशी कितीतरी उदाहरणे ईश्वरनिष्ठेची समजावी. कारण ईश्वराला लोककल्याण अपेक्षित आहे. माईकवर बेसूर आवाजात कीर्तन करणे, लाऊड स्पीकरवर गाणी वाजवून ध्वनिप्रदूषण करणे, वर्गणी गोळा करून रस्त्यांच्या दुतर्फा रोषणाई करणे, शोभायात्रा काढून रस्ते जाम करणे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे विद्यार्थी, नवजात बालके, आजारी माणसे यांना किती त्रास होत असेल याचे भान नसणे यासारखी कितीतरी उदाहरणे देवभोळेपणाची सांगता येतील. अशा देवभोळेपणात ईश्वर नसतो. स्वइंद्रियांचे तुष्टिकरण हाच त्यांचा देव असतो. देव-धर्माचे आम्ही किती सगेवाले याचे ते प्रदर्शन असते.

सर्वच धर्मातील प्रेषितांचे आचरण ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले’ असे होते. पण त्यांच्या शिकवणुकीस फाटा देऊन स्वत:चे दुकान चालवणाऱ्यांनी ईश्वर आणि त्याच्या पवित्र धर्मास गालबोट लावले आहे. प्रेषित, संत सद्गुरू हे सर्व अभिनंदनीय आहेत. त्यांना दूषणे देऊ नयेत. ते ईश्वराप्रमाणेच ईश्वरीयकृपेमुळे वैभवसंपन्न असून वैराग्यशील आहेत. ते तुमचे आमचे आश्रित नाहीत. ते देणारे आहेत, घेणारे नाहीत. प्रत्येक मनुष्य ईश्वराचा अनुयायी आहे, मालक नव्हे.

असत्याला कवटाळून असणारी धारणा धर्माची आड घेऊन तंटे घडवून आणते आणि दु:खाच्या खाईत लोटते. हे ईश्वराचे काम नव्हे. ईश्वराला आम्हाला दु:खात लोटण्याची गरजच काय. पेरले तसे उगवते या न्यायाने दु:खाला आम्हीच कारणीभूत असतो. सीसीटी.व्ही. कॅमेऱ्यात दु:ख निर्माण करणारी माणसांची पापकर्मे दिसतात. ईश्वर दिसतो काय?
– आशालता, वर्धा.

11-lp-coverमहत्त्वाच्या विषयावर भाष्य
५ फेब्रुवारीच्या अंकातील ‘बंद करा सुट्टय़ांची चंगळ’ डॉ. विजय पांढरीपांडे यांनी एक ज्वलंत विषयावर बोट ठेवले आहे. गेल्या ६९ वर्षांमध्ये प्रत्येक गटाच्या राजकीय पक्षाने सर्वाना खूश करण्याकरिता शासन त्याच्या मर्जीच्या सुट्टय़ा वाटप करत गेलं. आज ३६५ दिवसांपैकी २०१ दिवस आरामांत घरी बसून लठ्ठ पगार घेणे हा सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार झाला आहे. विशेषत: स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला लागून जर शनि, रवि, राखी किंवा जन्माष्टमी हे सण येतात तर आम्हा सर्वाना खूप आनंद होतो आणि हेच म्हणावंसं वाटतं की ‘भारत देशा महान देशा सुट्टय़ांच्या देशा’. आपल्या मागासलेपणाचं कारण आपल्याजवळच तर आहे! कोण पुढे येईल हे सांगायला की मला सुट्टी नको। म्हणूनच लेखकाला निक्षून लिहावे लागले, ‘बंद करा ही सुट्टय़ांची चंगळ!’ कर्मचारी व अधिकारी तर नक्कीच नाहीच म्हणतील, असे वाटते.
-संध्या बायवार, बानापुरा. जि. हौशंगाबाद (म.प्र.)

तरुणींचे प्रतिनिधित्व करणारे लेख
१ एप्रिलच्या अंकातील प्राची साटम यांचा ‘जंगलातली वाट’ हा लेख अतिशय आवडला. लेखात मांडलेल्या घटनांशी मी रिलेट करू शकले. ‘मनस्वी’ या सदरातील लेख तरुणींचं प्रतिनिधीत्व करणारे असतात.
– श्रुती साळवे, मुंबई.