नाशिक येथील आधारतीर्थ आश्रम शाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले 'आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली. ती चुक तुम्ही करू नका' अशा आशयाचा फलक घेऊन संत तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत. 'मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकड़े लक्ष द्या' अशी एकच हाक दिंडीतील मुलांकडून ऐकण्यास मिळाली. नाशिक येथील आधारतीर्थ आश्रममध्ये राज्यातील विविध भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. तेथील मुलांची दिंडी आळंदी ते पंढरपूर या दरम्यान असून या दिंडीचे यंदा पाचवे वर्ष आहे. यामध्ये वयोगट ५ ते १५ वर्षापर्यंतची ५० मुले सहभागी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, आत्महत्या हा पर्याय नाही, असा संदेश असलेल्या टोप्या त्या विद्यार्थ्यांनी घातल्या होत्या. उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. या वेळी अशोक मोतीराम पाटील म्हणाला की, माझ्या वडिलांनी मी ४ वर्षांचा असताना आत्महत्या केली. आजही राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी कायमस्वरूपी निर्णय घेण्याची गरज असून मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडे लक्ष द्या आणि शेतकऱ्ंयाचे राज्य येऊ द्या, अशी मागणी केली.