आतापर्यंत पावणेदोन लाख जणांचे लसीकरण वसई : वसई-विरार शहरातील करोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यातच आता महापालिकेने लसीकरण करण्यावर अधिक भर दिला आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे पावणेदोन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. वसई-विरार पालिकेच्या विविध ठिकाणी लसीकरण केंद्र उभारून लसीकरण करण्यास सुरुवात केली आहेत. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करता यावे यासाठी पालिकेकडून विविध प्रकारचे प्रयोगही राबविले जाऊ लागले आहेत. आठवडाभरापासून पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. नुकताच पालिकेने मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यास सुरुवातही केली. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांवरील व्यक्ती, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्ती, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती अशा १ लाख ८५ हजार ५८२ जणांचे लसीकरण पूर्ण केले होते. यात १ लाख ४९ हजार ४१२ जणांनी लशींची पहिली मात्रा तर ३६ हजार १७० जणांनी लशींची दुसरी मात्रा घेतली आहे. २६ मेपर्यंत पालिकेचे १ लाख ५० हजार २१५ लशींच्या मात्रा पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच पालिकेने ३५ हजार ३६७ लशींच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रा दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या लसीकरणात वाढ झाली आहे. टप्प्या टप्प्याने पालिकेच्या लसीकरण मोहिमेला गती मिळत असल्याने नागरिकांनाही मोठा दिलासा मिळू लागला आहे.