भाईंदर :  करोना आजाराच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका मिरा भाईंदर शहराला बसू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावर करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची करोना चाचणी करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. यामुळे करोनाचा प्रसार आटोक्यात येणार असून परिस्थितीवर नियंत्रण राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दुसऱ्या लाटेचा गंभीर फटका  शहराला बसला आहे. एप्रिल व मे महिन्यादरम्यान शहरात प्रतिदिवस ५०० ते ६०० रुग्ण मिळत असल्यामुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अशा स्वरूपाची परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना आखण्यात प्रशासनाकडून  अधिक भर देण्यात येत आहे.

तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत करण्यात आल्यामुळे खबरदारीची पावले उचलण्यात प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.  शुक्रवारपासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी आरोग्य विभागाकडून  प्रत्येक नागरिकांची करोना चाचणी करण्यात येत आहे. यात नागरिकांची प्रथमत: अँटिजेन चाचणी करण्यात येत असून अहवाल नकारात्मक आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. प्रति दिवस साधारण ५ हजार नागरिकांची चाचणी करण्याचे लक्ष ठरवण्यात आले आहे. तसेच याकरिता येणारा संपूर्ण खर्च प्रशासनाकडून उचलण्यात येणार आहे. त्यामुळे ही चाचणी नागरिकांकरिता मोफत असून करोना आजाराचा प्रसार रोखण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. चाचणी केलेल्या प्रत्येक नागरिकाचा केवळ ७ दिवसांकरिता अहवाल ग्रा धरला जाणार असून त्यानंतर पुन्हा चाचणी करणे अनिवार्य असेल, असे नोडल अधिकारी डॉ संतोष पांडे यांनी सांगितले.

या ठिकाणी करोना चाचणी 

  • रेल्वे स्थानक  ल्ल बस स्टॅन्ड
  • रक्षा स्टॅन्ड  ल्ल बँक
  • बाजार ल्ल पेट्रोल पंप
  • डीमार्ट,स्टार बाजार
  • औद्योगिक वसाहती.