वसई-विरारच्या अनेक भागांत खरेदीसाठी गर्दी; टप्प्यांबाबत गोंधळ

वसई: पालघरसह वसई-विरार शहराचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यानंतर सोमवारी शहरातील व्यवहार नित्यनिमयाने सुरू झाले. अनेक भागात नियम पायदळी तुडवून गर्दी झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती, तर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  तर आपले शहर कोणत्या टप्प्यात आहे याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ दिसून आला.

एप्रिल महिन्यापासून लागू असलेली टाळेबंदी शिथिल करताना राज्य शासनाने पाचस्तरीय टप्पे जाहीर केले होते. ज्या शहरातील रुग्ण सकारात्मक आढळण्याचा दर हा ५ टक्क्यांनी कमी आहे तसेच खाटांची उपलब्धता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना टप्पा क्रमांक ३ मध्ये (लेव्हल ३) समाविष्ट केला होता. त्यानुसार रविवारी दुपारी पालघरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी वसई-विरारसह पालघर जिल्हा टप्पा क्रमांक ३ मध्ये करण्यात आला. आपले शहर नेमके  टप्पा २ की टप्पा ३ याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ होता. निर्बंध शिथिल झाल्याने सोमवारपासून शहरातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले. गेल्या काही दिवसांपासून आमची दुकाने बंद होती, आता आम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटतंय आणि आमचा धंदा नव्या जोमाने होईल, असा विश्वाास राजेश शहा या दुकानदाराने व्यक्त केला.

पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळी साहित्य विकणाऱ्यांना मोठी चिंता भेडसावत होती. मात्र सोमवारी त्यांनी मोठ्या उत्साहाने आपली दुकाने खुली केली. वर्षभरात आम्ही याच कालावधीत धंदा करतो. टाळेबंदीमुळे आमच्या धंद्यावर अनिश्चिातता होती, परंतु आता दुकानांना परवानगी दिल्यामुळे आमची विक्री होईल आणि नागरिकांची देखील सोय होईल, असे पावसाळी साहित्य विकणाऱ्या ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. त्यांच्या दुकानात छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी के ली होती.

शहरातील सर्वच आस्थापने आणि दुकाने सुरू झाल्याने व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला. शहारातील केशकर्तनालये आणि सलून सुरू झाल्याने या दुकानांबाहेर गर्दी दिसून आली. लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येत होते. नालासोपारा, विरार आणि वसईमधील बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. अर्नाळा आणि आगाशी परिसरात तर निर्बंध पायदळी तुडवत गर्दी झाली होती.

पालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्याने बसेसमध्ये गर्दी दिसून आली. लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने रिक्षामध्ये देखील प्रवासी होते. अनेक रिक्षांनी नियम धाब्यावर बसवून प्रवासी रिक्षामध्ये भरल होते. सोमवारी पहिल्याच दिवशी लोक रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अंबाडी रोड, वसंतनगरी, तुळिंज, गोखिवरे रेंज ऑफिस येथे वाहतूक कोंडी होती. मला दररोज कार्यालयात येण्यासाठी २० मिनिटे लागतात, मात्र आज वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासांपेक्षा अधिक वेळ लागला, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.

टप्पा ३ मध्ये टाकल्यामुळे नाराजी

शुक्रवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात वसई-विरारचा समावेश टप्पा क्रमांक २ मध्ये होईल असे सांगण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक वसईचा समावेश टप्पा क्रमांक ३ मध्ये केला. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ३ जून पर्यंतच्या स्थितीनुसार हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे पालिका उपायुक्त किशोर गवस यांनी सांगितले. वसई-विरारचा समावेश टप्पा २ मध्ये केल्याने नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.

वसई-विरार शहराचा सकारात्मक दर ५.११ टक्के असल्याने टप्पा क्रमांक ३ मध्ये समावेश झाला आहे. नागरिकांवरील निर्बंध शिथिल झाले असले तरी त्यांनी नियमांचे पालन करावे. -गंगाथरन डी.,आयुक्त, वसई-विरार महापालिका