भाईंदर : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील ८ महिन्यात ४८६ वाहन अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात तब्बल १३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून २६७ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही दिवसापूर्वी पालघर येथील राष्टीय महामार्गावर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे वाहन अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा जाग्या झाल्या असून रस्ते सुरक्षेच्या दुष्टीने उपाय योजना आखण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र याच महामार्गालयाच्या अंतर्गत येत असलेल्या मीरा भाईंदर-वसई विरार शहराची परिस्थिती देखील अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे. पोलीस आयुक्तालयात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२२ पासून २८ ऑगस्ट पर्यंत राष्टीय, राज्य आणि इतर मार्गावर झालेल्या रस्ते अपघातांच्या एकूण ४८६ घटना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. धक्का दायक बाब म्हणजे यात तब्बल १३७ नागरिकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.यामध्ये १२१ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. याच शिवाय २६७ नागरिक हे गंभीर जखमी झाले असून थोडक्यात बजावले आहेत.त्याच प्रमाणे ६५ नागरिक हे लहान मोठय़ा अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. शहरातील रस्ते हे वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावे यासाठी मीरा भाईंदर आणि वसई विरार महानगरपालिकडून प्रति वर्षी कोटय़ावधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र पावसाची हजेरी लागताच या रस्त्याना खड्डे पडणे अथवा ते वाहून जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शिवाय वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून पोलिस आयुक्तालयाकडून देखील वाहतूक पोलिस कर्मचारी आणि मदतीस रस्त्यावर उभे केले जातात.मात्र मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याऐवजी कारवाई करण्यात गुंतलेले दिसून येतात.त्यामुळे शहरातील रस्ते हे वाहतुकी साठी धोकादायक असून रोज त्यावर मृत्यूचा खेळ सुरु असल्याचे आरोप मृतक नागरिकांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. विनासीटबेल्ट प्रकरणी ४६ लाखांचा दंड वसुल वाहन अपघातात वाहतुकीच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.यात सीटबेल्ट न लावणे,वाहनाची हेड लाईट बंद असणे, वाहन चालवत असताना फोन वर बोलणे आणि जोरजोरात ध्वनी यंत्र वाजवणे अश्या गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय कडून नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता कारवाईची सक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्यानुसार गेल्या नऊ महिन्यात सीट बेल्ट चा वापर न करणाऱ्या २४ हजार ४०७ वाहनावर पोलिसांनी कारवाई करून ४६ लाख ८० हजार ४०० इतका दंड वसुल केला असल्याची माहिती मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.