८९ मॅट्रिक टन साठा उपलब्ध वसई : करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्राणवायू (ऑक्सिजन) मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली होती. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पालिका आधीच सतर्क राहिली आहे. वसई-विरार महापालिकेकडे प्राणवायूचा ८९ मॅट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून सद्य:स्थितीत हा साठा पुरेसा आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका वसई-विरार शहराला बसला होता. दुसऱ्या लाटेत शहरात मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. यातील करोनामुळे गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना उपचारांदरम्यान प्राणवायूची गरज भासत होती. यामुळे विविध ठिकाणाहून प्राणवायू मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती. वसई-विरार शहरात दुसऱ्या लाटेत प्रतिदिन २५ मॅट्रिक टन प्राणवायूची गरज भासत होती. हीच परिस्थिती लक्षात घेता तिसऱ्या करोनालाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने ही पालिकांना सोयी सुविधांच्या संदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने चंदनसार, बोळिंज, सोपारा, वसई वरुण इंडस्ट्री अशा ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत पालिकेकडे ८९ मॅट्रिक टन इतका प्राणवायूचा साठा उपलब्ध आहे. याआधीच्या लागणाऱ्या प्राणवायूच्या साठय़ापेक्षा तीन पटीहून अधिकचा साठा पालिकेकडे उपलब्ध झाला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूची जास्त गरज भासली होती त्याच अनुषंगाने आता पालिकेने उपाययोजना केल्या असून करोना उपचार केंद्र येथे प्राणवायू प्रकल्प सुरू केले आहेत. त्यामुळे रुग्णांना गरज पडल्यास पुरेसा प्राणवायू उपलब्ध करून देता येईल. - डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिका