वसई: वसई-विरार शहरातील पाणीटंचाई आणि त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयींची दखल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. शहराच्या पाण्याचे नियोजन आणि एकंदरीत पाणी समस्येचा आढावा घेण्यासाठी पाण्याचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. शहराला दररोज २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यातही १२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत असते. सदोष वितरण व्यवस्था, ठिकठिकाणी होत असलेली पाण्याची गळती, पाणी चोरी, वारंवार जलवाहिन्या फुटणे आदी प्रकारांमुळे पाणीटंचाईत भर पडली आहे. अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो तर अनेक ठिकाणी ३ ते ४ दिवसांनी पाणी येते. यामुळे शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी माजी स्थायी सभापती सुदेश चौधरी आणि माजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा योजनेचे लेखापरीक्षण करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.