वसई : मागील अनेक वर्षांपासून चिंचोटी- कामण-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. दिवसेंदिवस रस्त्याची स्थिती अधिकाधिक बिघडत असल्याने पावसाळय़ाआधी तरी प्रशासन आता रस्ता दुरुस्ती करणार का, असा प्रश्न संतप्त नागरिक करत आहेत.
वसई पूर्वेतून चिंचोटी-भिवंडी राज्य महामार्ग गेला आहे. या रस्त्यावरून दररोज मोठय़ा संख्येने वाहने धावतात. पण रस्त्याच्या देखभालीकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. त्यामुळेच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातही होतात. हा महामार्ग आहे की खड्डे मार्ग असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याबाबतीत डोळे झाकून बसले आहे. या विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे अजिबात लक्ष दिले जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. पावसाळय़ात रस्त्याची स्थिती मागील वर्षांपेक्षा जास्त खराब होते आणि रस्ता अधिक धोकादायक बनतो. याचा फटका वाहनचालक तसेच रस्त्यालगतच्या गावातील रहिवाशांना बसतो.
रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी आंदोलनेही केली. पण तेव्हा तात्पुरता देखावा करून खडी टाकली जाते. पुन्हा रस्त्याची स्थिती जैसे थे असते. त्यामुळे आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते केदार म्हात्रे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awaiting repair chinchoti kaman bhiwandi road administration state highways amy
First published on: 19-05-2022 at 00:08 IST