मीरा भाईंदरमध्ये केवळ ३८४ सक्रिय रुग्ण

भाईंदर : मीरा भाईंदर शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असून उपचाराधीन रुग्ण हे चारशेपेक्षा कमी झाले आहेत. यात शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्याची संख्या कमी झाल्याने रुग्णालयातील खाटा रिकाम्या होऊ लागल्या आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका मीरा भाईंदर शहराला बसला होता. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांना जागा मिळणे कठीण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रसार जलद गतीने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी समोर आलेल्या अहवालानुसार ८९ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधित आकडा ४९ हजार ४८३ इतका झाला आहे. तर ३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागण्याने एकूण बळीची संख्या १ हजार २९४ इतकी झाली आहे.

त्याचप्रमाणे ११८ रुग्णांना करोनामुक्त करण्यात आले आल्याने एकूण ४८ हजार ८०५ रुग्णांना वाचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या शहरात आता ३८४ उपचाराधीन रुग्ण शिल्लक राहिले असून हे प्रमाण केवळ ०.७८ टक्क्यांवर आले आहे. तर करोनामुक्त रुग्णाचे प्रमाण हे ९६.६१ टक्के झाल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

करोना प्रसार पूर्णत: आटोक्यात आणण्याकरिता नागरिकांना गृहविलगीकरणाची परवानगी नाकारण्यात येत असून रुग्णालयातच उपचार घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र असे असतानादेखील केवळ ३०५ रुग्णच हे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालय रिकामी झाली असल्याने नागरिकांकडून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी गाफील न राहता उपाययोजनेवरच भर देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सध्या रुग्णालयात असलेल्या रुग्णांची संख्या

  •  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय : ६२
  •  प्रमोद महाजन रुग्णालय : ११८
  •  अप्पासाहेब धर्माधिकारी रुग्णालय : ००
  •  समृद्धी कोविड रुग्णालय : ११५
  • आर टू कोविड केंद्र : ००
  • मीनाताई ठाकरे रुग्णालय : ००
  • उत्तन चौक : १०
  •  तपोवन विद्यालय कोविड केंद्र : १६