विरार : वसई विरार परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वसई विरार महापालिकेतर्फे श्वान निर्बीजीकरणाची कोणतीही प्रक्रिया राबविली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस श्वानांची संख्या वाढत आहे. श्वानगणनाच झालेली नसल्याने निर्बीजीकरण प्रक्रियेतही अडथळा येत आहे.वसई विरार महानगरपालिकेने स्थापनेपासून आजतायागत श्वानांची गणना केली नाही. श्वानसंख्या नियंत्रणाविषयी पालिकेने उपाययोजनाच आखल्या नाहीत. करोनाकाळात पालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने तीन निर्बीजीकरण केंद्रांचा प्रस्ताव बासनातच गुंडाळलेला आहे. सध्या शहरात केवळ एकच निर्बीजीकरण केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र पालिकेने एका खासगी ठेकेदाराला दिले आहे. येथे केवळ एकच रुग्णवाहिका कार्यरत आहे. त्यामुळेच श्वानांच्या निर्बीजीकरणाचा पालिकेचा वेग अत्यंत कमी आहे.वसई विरार परिसरात करोनाकाळात श्वान निर्बीजीकरण यंत्रणा पूर्णत: ठप्प असल्याने श्वानांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. परिणामी शहरातील सर्व भागात श्वानांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी, रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या मागे हे भटके श्वान धावतात. त्यामुळे अपघात होतात. दुचाकीस्वारांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहेत. श्वानदंशाच्या अनेक तक्रारी येत आहेत.एवढे सगळे होऊनही पालिकेची श्वानगणना केवळ कागदावरच उरली आहे.