एकेकाळी विविध प्रकारच्या फुलांनी बहरणारी  वसईतील फुलशेती आता वातावरणातील लहरीपणामुळे धोक्यात सापडू लागली आहे. मागील काही वर्षांपासून फुलांचे उत्पादन कमालीचे घटत आहे. त्याचा मोठा फटका येथील फुलशेतकऱ्यांना बसत आहे. मात्र त्यावर उपायोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून अजूनही आवश्यक ती पावले उचलली जात नसल्याने दिवसेंदिवस वसईतील फुलांचा बहर मावळू लागला आहे. हा एकप्रकारे शेतकरी वर्गासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

वसईचा परिसर म्हणजे भात शेती, केळीच्या बागा, नारळ, पालेभाज्या, फुलशेती अशा विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रसिध्द असलेला भाग म्हणून ओळखला जातो. विशेषतः हरित वसईचे सुरवातीला वातावरण पोषक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वाडीत, शेतात फुलबागा फुलविल्या होत्या. त्यातूनही चांगले उत्पादन हाती येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळत त्यांनी चाफा,  मोगरा,सायली,जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या फुलांना फुल बाजारात विशेष मागणी आहे.

विशेषतः गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा  अशा विविध प्रकारच्या सणासुदीचा काळ म्हणजे येथील फुल शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस समजले जातात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच खऱ्या अर्थाने या भागातील अर्थकारण चालते.

आधुनिक शेतीवर भर

वसईतील शेतकरी केवळ नियमित तयार होणाऱ्या फुलांच्या उत्पादनावर न थांबता अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच आधुनिक शेतीचे प्रयोग ही त्यांनी यशस्वी केले आहेत. यात समारंभात सजावट करण्यासाठी लागणाऱ्या ऑर्किट, आयरस हॉलीफोर्निया,जरबेरा, यासह इतर फुलांचे लागवड करीत त्याचे चांगले उत्पादन घेण्यास सुरुवात केली. अशा विविध प्रकारच्या शेती प्रयोगामुळे येथील फुलशेती उत्पादन हे वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचेल अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे. परंतु अलीकडच्या काळात वातावरणात निर्माण होणाऱ्या हवामान बदलामुळे येथील फुलशेतीला पुन्हा एकदा उतरती कळा लागली आहे. विविध प्रजातीची फुले आता फुलत नाहीत त्यामुळे उत्पादन कमी होऊ लागले आहे. विशेषतः सोनचाफा बारा महिने त्याला बहर येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागेत सोनचाफ्याची लागवड करण्यास सुरुवात केली होती. त्याचेही उत्पादन आता निम्म्यावर येऊन पोहचले आहे.अपेक्षित उत्पादन येत नसल्याने लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे.

दुसरीकडे वाढत्या महागाईचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. मशागतीचा, बी बियाणे, रोपवाटिका, मजूर खर्च, औषध फवारणी,खते याचा खर्च ही दीड ते दोन पट झाला आहे. त्यातच शेती वाडीत काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आणि जे मजूर मिळतात त्यांनाही जास्त मजुरी देऊन कामे करवून घ्यावी लागतात. अशी बिकट परिस्थिती असताना ही येथील शेतकरी काटकसर करून शेती क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्याच्या प्रयत्नशीलतेला शासन स्तरावरून योग्य ती साथ मिळत नसल्याने पुढे शेती टिकवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहे. आज राज्यात शेतकऱ्यांना सजग व अधिकाअधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून मार्गदर्शन करणे, शेती संशोधन, माती परीक्षण केले जाते. त्यामुळे नेमके कोणते उत्पादन घेण्यास शेतजमीन पोषक आहे याची माहिती मिळते. मात्र वसईच्या बाबतीत चित्र उलट असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात विविध ठिकाणच्या भागात शेतीच्या संदर्भात समस्या निर्माण होतात तेव्हा त्यांना कृषी विभागाकडून संशोधन करून उपाय सांगितले जातात. मात्र अनेक वर्षांपासून एकदा ही उपायोजना करण्याच्या किंवा अभ्यासाच्या दृष्टीने संशोधन झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. वसईतील फुल शेतीची ओळख टिकवून ठेवायची असेल तर आधी येथील उत्पादन का घटते ? त्याची कारणे काय ? त्यावर कोणते उपाय करणे आवश्यक आहे ? अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास करणे आता गरजेचे आहे. कृषी विभागाने ही केवळ विशिष्ट कार्यक्रमा पुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात वसईच्या भागातील शेतीची स्थिती काय आहे हे जाणून घेतले तरच येथील मावळत असलेली फुलशेती पुन्हा जोमाने उभी करता येईल.

लागवड क्षेत्र ही घटले

वसईचा शेती लागवडीचा परिसर म्हणून ओळख निर्माण झाली होती. वाढत्या नागरीकरणामुळे भातशेतीच्या लागवड क्षेत्रातच विकासकामे वाढली आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. तसेच दुष्काळ, अवकाळी पाऊस,  पिकांवर होणार रोगाचा प्रादुर्भाव  , पिकणाऱ्या शेत जमीनीला लागूनच होणारी  प्रचंड भरावाची  विकास कामे , मोकाट गुरे , मजुरांची टंचाई , श्रमाच्या मानाने मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि त्यात वाढती महागाई अशा विविध कारणांमुळे शेतकरी भातशेती करणे सोडून देत आहेत. तर दुसरीकडे शहरीकरण, विविध प्रकारचे विकास प्रकल्प यामुळे ही शेती कमी कमी होत आहे. सुरवातीला शहरात नऊ हजार हेक्टराहून अधिक शेती लागवड क्षेत्र होते. हळूहळू क्षेत्र कमी होऊ सद्यस्थितीत  ७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र लागवडीचे क्षेत्र उरले आहे. यावरूनच लागवड क्षेत्रात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात वसईत शेती क्षेत्र टिकेल की नाही अशी चिंता ही व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समन्वय साधायला हवा

वसई विरार शहरात सध्या काही निवडक शेतकरी जरी शेती उत्पादनात सक्रिय असले तरीही त्यांच्यासोबत कृषी विभागाने ही समन्वय साधणे गरजेचे आहे. त्यांना शासनाने लागू केलेल्या योजना, त्यांचे अनुदान, मार्गदर्शन शिबीरे, मेळावे, बाजार पेठ उपलब्ध करून देणे, असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. परंतु त्याचा अभाव असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे शेती सोडून अन्य मार्गाकडे वळतात. त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभाग यांचा समन्वय साधला जाणे अंत्यत गरजेचे बनले आहे.