वसई: मंगळवारी रात्री पासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळीवाऱ्यामुळे वसई विरार किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावरच थांबवून ठेवण्याची वेळ आली आहे. विशेष हा मासेमारीचा या हंगामातील अखेरचा महिना आहे.
वसई विरारच्या किनार पट्टीच्या भागात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव हे मासेमारीचा व्यवसाय करतात. विशेषतः अर्नाळा, पाचबंदर, नायगाव, कोळीवाडा, किल्लाबंदर अशा विविध ठिकाणच्या भागातील मच्छीमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. या भागात मासेमारीच्या आठशेहून अधिक बोटी असून मच्छिमार बांधव हे बोटी घेऊन मासेमारी खोल समुद्रात जातात.ऑगस्ट ते मे या दहा महिन्या दरम्यान मासेमारीचा व्यवसाय चालतो. मात्र एकापाठोपाठ येणारी वादळे, खराब हवामान आणि त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये होणारे बदल तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छिमार पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मे महिना हा मच्छीमारांच्या मासेमारीसाठीचा अखेरचा महिना त्यानंतर पुढील काही महिने मासेमारी बंद ठेवावी लागणार आहे. अशात आता भारतीय हवामान खात्याने वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या वादळीवाऱ्यामुळे मच्छीमारांना आपल्या बोटी समुद्र किनारीच नांगरून ठेवाव्या लागल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मासेमारी हंगामाचा यंदाचा शेवट असल्याने मोठ्या ताकदीने तयारी करून मच्छीमार बांधव खोल समुद्रात मासेमारी जातात. परंतु आता वादळीवारे सुरू झाल्याने जाता आले नसल्याचे येथील मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे. जे गेले आहेत त्यांना ही आम्ही पुन्हा माघारी बोलावून घेत आहोत असेही या बांधवांनी सांगितले आहे.
आता काही १५ ते २० दिवसच मासेमारी करण्याची संधी होती. त्यामुळे बर्फ, जाळी, डिझेल यासह आवश्यक वस्तू बोटीत भरून बोटी तयार ठेवल्या होत्या. मात्र अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे ही खेप रद्द करावी लागली असल्याचे मच्छिमार बांधव मोजेस आबा यांनी सांगितले आहे.
आता बोटी मासेमारी साठी न गेल्याने जो काही बर्फ विकत घेतला होता त्याचे नुकसान मात्र सहन करावे लागणार असल्याचे अर्नाळा येथील मच्छिमार बांधव दर्शन सावरा यांनी सांगितले आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिले तर पुढील काळ मच्छीमारांसाठी चिंतेचा असेल अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे.
विशेष काळजीमुळे नुकसान टळले
काही वर्षांपूर्वी किनार पट्टीवर तौक्ते वादळ आले होते. त्याचा मोठा फटका मच्छिमार बांधवांना बसला होता. लाटांचा व वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोर तुटून गेले होते आणि बोटी किनाऱ्यावर जोराने आदळून गेल्याने बोटींचे प्रचंड नुकसान झाले होते. असे नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी व्यवस्थितपणे बोटी नांगरून ठेवल्या जात आहे. जेव्हा जेव्हा वादळाचा इशारा असतो तेव्हा सतर्क राहून काम करावे लागते असे मच्छिमार बांधवांनी सांगितले.
किनाऱ्यावर सतकर्ता
मासेमारी साठी बोटी जरी खोल समुद्रात सोडल्या नसल्या तरीही मच्छिमार बांधव नांगरून ठेवलेल्या बोटीच्या ठिकाणी सतकर्ता बाळगून आहेत. व्यवस्थित पणे बोटी बांधून ठेवणे, किनाऱ्यावरील लाटांचा अंदाज घेणे व त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अशी कामे करीत आहोत असे येथील मच्छिमार बांधवांचे म्हणणे आहे.