वसई:साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया निमित्ताने वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यानिमित्ताने वसई विरारसह पालघर मध्ये आठवडा भरात ५ हजार ३१७ नवीन वाहनांची नोंद करण्यात आली आहे.दरवर्षी अक्षय्य तृतीया, बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, दसरा या साडेतीन मुहूर्तांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वाहन,सोने चांदी, घर अथवा नवीन कोणत्याही वस्तूची खरेदी केली जाते.
दुचाकी किंवा चारचाकी घेण्याआधी प्रत्येकजण शुभ मुहूर्त पाहत असतो. त्यामुळे मुहूर्तावर वाहन खरेदी करणे योग्य मानले जाते.
अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ही वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
वाहन खरेदी करण्यासाठी आठवडा भर आधीपासूनच ग्राहकांची वाहन विक्रीच्या दुकानात रेलचेल सुरू होती.
ग्राहकांला हवी असलेली गाडी,तिचा रंग, किंमत, इत्यादी चौकशी सुरू झाली होती. तर काहींनी आधीच गाड्या विक्रीच्या दुकानात जाऊन आगाऊ रक्कम भरून गाड्यांची नोंद केली होती. अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने परिवहन विभागात ५ हजार ३१७ वाहनांची नोंद करण्यात आली आहे.
याच ४ हजार ९० दुचाकी, ५७७ मोटार कार, ऑटोरिक्षा २०७, मालवाहतूक टेम्पो २७५, कृषी ट्रॅक्टर १२, मोटार कॅब १०२, इतर ५४ वाहनांचा समावेश असून यातून लाखों रुपयांचा महसूल परिवहन विभागाला मिळाला आहे. काहींनी आज वाहन खरेदी केली आहेत त्यामुळे ती वाहने पुढील आठवड्यात नोंदणीसाठी येतील असे परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.