वसई: वसईत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषिपंपाच्या वीज देयकांवर महावितरणने आता कोल्ड स्टोरेज असा उल्लेख केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकची वीज देयके दिली जात असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसई-विरारच्या पश्चिमेच्या भागात शेतकरी फळबागा व फुलबागाची शेती करतात. यातील काही शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी कृषिपंप वीज मीटर बसविले आहेत. मात्र या वीज देयकांवर आता कृषिपंपऐवजी कोल्ड स्टोरेज व इतर असा उल्लेख होऊ लागला आहे. विरारजवळील अर्नाळा या भागातही अशाच प्रकारची वीज देयके दिली जात आहेत. सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील अल्प भूधारक शेतकरी हा मोजक्या गुंठय़ांत पिढीजात व पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी वर्ग आहे. क्षेत्र कमी असल्याने आधुनिकीकरणाला वाव नाही. त्यामुळे कोल्ड स्टोरेजच्या इतक्या वीजदाबाची गरज नसताना येथील शेतकऱ्यांच्या वीज देयकांवर कोल्ड स्टोरेज असा उल्लेख केला असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार वाढीव वीज देयके येऊ लागली आहे. वीज देयके भरली तरीही पुन:पुन्हा वाढीव वीज देयके दिली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे. याबाबत महावितरणने संबंधित वीज देयकांची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही वीज देयकांच्या संदर्भात तक्रारी असतील त्याचे निवारण केले जाईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.