वसई: वसईतील राष्ट्रपुरुषांच्या पुतळय़ांच्या साफसफाईसाठी कार्यकर्ते पुढे आले आहेत. शहरातील राष्ट्रपुरुषांचे पुतळे धूळ खात पडत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.नालासोपारा शहरात महाराणा प्रताप समितीने सहा राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांच्या पुतळय़ांचा समावेश होता. १९९० मध्ये ही समिती बरखास्त झाली आणि पुतळे वाऱ्यावर पडले. पुतळय़ांचे मालकच कुणी नसल्याने पुतळय़ांची देखभाल होत नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता- वसई विरार’ सहदैनिकात प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर सामाजिक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थांचे कार्यकर्ते पुढे आले आहेत. रविवारी कार्यकर्त्यांनी सोपारा येथील हेडगेवार यांच्या पुतळय़ाची साफसफाई केली. सेव्हन आर्ट्स ग्रुप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप जोशी, प्रवीण पाटील, नीरव शुक्ला, मोहक पाटील, समीर कर्णिक, संजय वैद्य यांनी याकामी पुढाकार घेतला. आठवडय़ाभरात या पुतळय़ाचे स्वखर्चाने सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. खरं तर आमच्याकडून अनावधानाने दुर्लक्ष झाले होते. मात्र ‘लोकसत्ता’ने ही बाब समोर आणल्यानंतर आम्ही या पुतळय़ाची नियमित देखभाल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपचे वसई विरार उपजिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.पुतळा संवर्धनासाठी समिती पुनरुज्जीवित करणारमहाराणा प्रताप समितीने सहा पुतळे उभारल्यानंतर समिती बरखास्त झाली होती. त्यामुळे पुतळय़ांची देखभाल होत नव्हती. त्यासाठी नव्याने ही समिती तयार करून पुतळय़ांची देखभाल केली जाणार असल्याची माहिती मनोज पाटील यांनी दिली. तोपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांला पुतळे वाटून दिले असून त्यांच्यामार्फत या पुतळय़ाची नियमित स्वच्छता केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महापालिकेची सकारात्मकतावसई विरार महापालिका आयु्क्त अनिलकुमार पवार यांनीदेखील या राष्ट्रपुतळय़ांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. हे पुतळे खासगी जागेत आहेत. महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी जे धोरण आहे ते तपासले जाईल; परंतु या पुतळय़ांची महापालिकेमार्फत देखभाल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.