उंचीअभावी एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर वाहने कोसळण्याचे प्रकार; अपघात रोखण्यासाठी उंची वाढविण्याची मागणी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकांची उंची कमी असल्याने अपघात घडल्यानंतर अनेक वाहने ही एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जाऊन कोसळत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा प्रकारामुळे इतर अपघात होण्याची शक्यता असल्याने या दुभाजकांची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. दररोज या मार्गावरून मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच गुजरात व मुंबई हा जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग समजला जातो. या महामार्गाच्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत दुभाजक तयार करण्यात आले आहेत. मात्र तयार करण्यात आलेल्या दुभाजकांची उंची ही अपुरी आहे. अनेकदा महामार्गावर विविध प्रकारच्या अपघातांच्या घटना घडतात. या अपघातांच्या घटनांमध्ये एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जाऊन पडणे व धडक बसणे अशा घटनांचाही समावेश आहे. गुरुवारी वसई पूर्वेच्या भारोळ गावाच्या हद्दीत झालेल्या घटनेमध्येही मुंबई वाहिनीवरून वाहन उलटून थेट गुजरात वाहिनीवर पडल्याचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे दुभाजकांच्या उंचीचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. या घटनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या तर निर्माण होतेच. याशिवाय एका वाहनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जाऊन कोसळत असल्याने त्या वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांचाही अपघात होण्याचा शक्यता आहे. महामार्गावर पथदिवे नाहीत. त्यातच दुभाजकांची उंची कमी असल्याने रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांनाही दुभाजक दिसून येत नसल्याने एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जाण्याचे प्रकार घडत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. महामार्ग ओलांडून जाण्याचे प्रमाण अधिक दुभाजकांची उंची कमी असल्याने अनेक जण सहजपणे महामार्ग ओलांडून प्रवास करतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. यामुळे काही जण जखमी तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे दुभाजकांच्या कमी उंचीचा गैरफायदा घेत अनेक जण छेद रस्ता तयार करून मधून वाहनांची ने-आण करतात. विशेषत: वाहतूक कोंडी होते तेव्हा दुसऱ्या मार्गिकेवरून जाण्यासाठी थेट गाडी दुभाजकांवरून चढवून नेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांची मागणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अधूनमधून अपघाताच्या घटना घडतात. या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुभाजकांची उंची कमी असल्याने अपघाताच्या घटना घडल्यानंतर अवजड वाहने ही एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर पडण्याच्या घटना घडतात. यामुळे इतर अपघाताच्या घटना व वाहतूक कोंडीची समस्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करायचे असेल तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुभाजकांची उंची वाढविणे गरजेचे असल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. तसेच महिनाभरापूर्वी खा. राजेंद्र गावित यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी व वाहतूक पोलीस व महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीतही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दुभाजकांची उंची वाढविण्याची मागणी केली होती.