वसई : २५ लाखांच्या खंडणीसाठी १३ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण मिरा रोड येथे उघडकीस आले आहे. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी २ आरोपींना अटक केली आहे. मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग ही महिला अजय (१५) आणि मयाक सिंग (१३) या दोन मुलांस राहते. ती बोरिवलीच्या एका बार मध्ये गायिका म्हणून काम करते. रविवारी रात्री ती नेहमप्रमाणे कामावर गेली होती. रात्री १२ च्या सुमारास तिचा मुलगा मयांक हा घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी मयंकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी अफझल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२४) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र होते. मयंकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे त्यांना वाटले. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता. दरम्यान, मयांकला संशय आल्याने आरोपीनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले.