विरार : वसई-विरारमध्ये तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. मागील आठवडय़ापासून करोना रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेने शहरात निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पालिका मात्र आठवडा बाजारांना बिनदिक्कत परवानगी देत आहे. वसई-विरारमध्ये मागील आठवडाभरात ६७६० रुग्ण आढळून आले आहेत. करोनाकाळात टाळेबंदी दरम्यान महापालिकेने आठवडा बाजारांवर बंदी घातली होती. पण करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी २५ आठवडा बाजारांना परवाने दिले होती. पण मुळात याहून अधिक प्रमाणात आठवडा बाजार शहरात भरविले जात आहेत. या बाजारात करोना नियमांची पायमल्ली होत आहे. आठवडा बाजाराबरोबर इतरही नियमित बाजार भरविले जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बस्तान मांडत रस्ते गिळंकृत करत बाजार मांडत आहेत. यामुळे शहरात गर्दीचे ठिकाणे वाढत आहेत. बाजारांमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने करोना करोना संक्रमण वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात इतर सर्व दुकानांना निर्बंध असताना केवळ आठवडे बाजारांना आणि जत्रा यांना परवानगी कशी दिली जात आहे. यामुळे करोना प्रसार होणार नाही का असा सवाल काँग्रेस शहर अध्यक्ष नितीन उबाळे यांनी विचारला आहे. शासनाकडून आठवडा बाजारांसंदर्भात कोणतेही नियमावली आली नाही यामुळे त्यांना परवानगी दिली जात आहे. शासनाकडून निर्बंध आल्यास परवानगी बंद केली जाईल.’’ - पंकज पाटील , उपायुक्त, वसई विरार महानगरपालिका