भाईंदर : मिरा भाईंदर शहरात टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे महापालिकेने उभारलेली ऑनलाईन कार्यप्रणाली फोल ठरवू लागल्याची तक्रार पुढे येत आहे.मिरा भाईंदर शहराला मंजुर कोट्याप्रमाणे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे दर आठवड्याला पाणी टंचाईचे संकट उभे राहत आहे.पाण्याची ही गरज भरून काढण्यासाठी भाईंदर पूर्व येथील जुन्या रेल्वे फाटकाजवळ असलेल्या जलकुंभावरून महापालिकेद्वारे नागरिकांना टँकरचा पुरवठा केला जातो.यात केवळ रहिवाशी वापरातील वापरकर्त्यांना पाणी वितरण करण्याचे महापालिकेचे धोरण आहे.

यासाठी रहिवासी इमारतींना प्रति टँकर १००० रुपये आणि झोपडीवासीयांना प्रति टँकर ५०० रुपये दर आकारणी केली जाते.नागरिकांना वेळेत टँकरचे पाणी मिळावे तसेच यात होणारा घोळ थांबावा म्हणून प्रशासनाने टँकर व्यवसायासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. यात नोंदणी करण्यात आलेला सर्व अहवाल थेट संबंधित विभाग प्रमुखांकडे पोहचत आहे.यात कोणाला पाणी द्यायचे अथवा किती द्यायचे याबाबतचे सर्वस्वी अधिकार पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांनी नोंदणी केल्यावर दोन तासातच पाणी मिळणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.परंतु प्रत्यक्ष पाण्याची नोंदणी केल्यानंतर सहा तासानंतरही पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पाण्याचे योग्य वेळापत्रक आखले जात असून सुरळीत पाण्याचे वितरण केले जात असल्याची प्रतिक्रिया महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

खासगी टँकर चालकांचा मनमानी कारभार सुरूच

मिरा भाईंदर शहरात खासगी पाणी विक्रेत्यांच्या पाण्याची गुणवत्ता नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ‘परवाना’ दिला जातो.यासाठी वार्षिक पाच हजार रुपयाची शुल्क आकारणी केली जाते.यात अतिरिक्त शुल्क आकारणी केल्यास तसेच गढूळ पाणीपुरवठा केल्यास हे परवाने रद्द करण्याची तरतूद आहे.मात्र तरी देखील अनेक टँकर चालक गढूळ पाणीपुरवठा करत असून मनमानी कारभार राबवत असल्याची तक्रार केली जात आहे.