भाईंदर : ई-कार्य प्रणालीचा वापर करून नागरिकांना अधिकाअधिक सुविधा पुरविणाऱ्या राज्यातील २७ महापालिकांमध्ये मीरा-भाईंदर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुण्यातील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने राज्यातील शहरांच्या ई-गव्हर्नन्सबाबतच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करण्यात आला होता. यात १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत या महापालिकांचे अधिकृत संकेतस्थळ , मोबाइल अॅप्लिकेशन, समाज माध्यम तपासण्यात आले होते. सुघोष जोशी, साक्षी सोहोनी यांच्या नेतृत्वात तीन महिन्यांच्या कालावधीत ११ जणांच्या गटाने या प्रकल्पावर काम केले होते. महापालिकेने १० पैकी १० गुण मिळवून महानगरपालिकाने समाज माध्यमांवर सेवा देण्यात येणाऱ्या राज्यातील २७ पालिकांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. सर्व उपक्रमात उपलब्धता व महानगरपालिकेच्या कामातील पारदर्शकता यामध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे. अॅपला उत्तम प्रतिसाद मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘माय एमबीएमसी’अॅपच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मूलभूत सेवा दिल्या. ऑनलाईन मालमत्ता कर भरणा, पाणीपट्टी कर भरणा, पदाधिकाऱ्यांची माहिती, शहरातील सुविधांबाबत माहिती, लसीकरण वेळापत्रक, तक्रार नोंदणी, नवीन नळजोडणीकामी अर्ज करणे, मान्यता प्राप्त बांधकामाची माहिती इत्यादी मूलभूत सुविधा अॅपवर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती उपायु्क्त मारूती गायकवाड यांनी दिली. ई- कार्यप्रणाली अधिक कार्यक्षम करून नागरिकांना घरबसल्या सोयीसुविधा देण्यात आम्हाला यश आले आहे. राज्यात महापालिका प्रथम आली हे त्याचेच प्रतीक असल्याचे पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.