कारवाईसाठी विशेष पथक वसई: वसई-विरार शहरात काही ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अनधिकृत नळजोडण्या घेऊन पाण्याची चोरी केली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी अखेर पालिकेने कारवाईसाठी विशेष पथक नेमून कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०४ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत पालिकेकडून दररोज २३० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, परंतु त्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही तर काही ठिकाणी अनधिकृत नळजोडण्या व छुप्या मार्गाने होणारी पाणी चोरी यामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्याचे कृषीमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी वसई विरारच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी शहरात देण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडण्या व पाणी समस्येविषयी तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पाण्याचे लेखापरीक्षण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानंतर काहीच कारवाई झाली नसल्याने भाजपाचे वसई विरार उपाध्यक्ष मनोज बारोट यांनीही पालिकेच्या आयुक्तांना याबाबत तक्रार करून अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली होती. अखेर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पालिकेने शहरातील बेकायदेशीर नळजोडण्या खंडित करण्याची सुरुवात केली आहे. परंतु ज्या पाणी माफिया व अधिकारी यांच्या संगनमताने या जोडण्या देण्यात आल्या आहेत अशा दोषी अधिकारी व पाणी माफिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनोज बारोट यांनी केली आहे. तोडण्यात आलेल्या १०४ बेकायदा नळजोडण्या ग्राहकांकडून कोणताही दंड न आकारता, नवीन नळजोडणीसाठी निष्टिद्धr(१५५)त केलेल्या किमतीच्या आधारे बेकायदेशीर जोडणी ग्राहकांनाकडून पैसे भरण्याची मागणी करुन त्यांची जोडणी कायदेशीर करुन घ्यावी तसेच ह्य १०४ अवैध नळ जोडण्या कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली कोणत्या अधिकारम्य़ाने ही सर्व अवैध जोडण्या देऊन नागरिकांची फसवणूक केली? या बाबत एक विशेष चौकशी समिती स्थापन करून त्याची चौकशी करावी. तसेच या अवैध नळजोडणीसाठी नागरिकांकडून किती पैसे वसूल केले? आणि आजपर्यंत किती लिटर पाण्याची चोरी झाली? त्याचे मूल्यमापन करून या दोषींकडून महापालिकेचा महसूल वसूल करण्यात यावा अशीही मागणी बारोट यांनी पालिकेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. पाणी चोरी व अनधिकृत नळजोडण्या संदर्भात तक्रारी येत होत्या. त्याच अनुषंगाने आता पथक नेमून कारवाई सुरू केली आहे. यात बेकायदेशीरपणे नळजोडणी घेऊन पाणी वापर करीत आहेत त्यांच्या नळजोडण्या खंडित केल्या जात आहेत. — सुरेंद्र ठाकरे, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग महापालिका